अकोले – भारतात दरवर्षी पाच लाखाच्या दरम्यान अपघात होत असतात. त्यामध्ये ५० टक्के अपघात मोटरसायकलचे होतात तर दीड लाख लोक अपघातात मुत्यूमुखी पडतात. देशात रस्ता सुरक्षा अभियान साजरे होत असून, वाहने चालविताना आपली स्वतःची जबाबदारी ओळखून स्वतःसहित सर्वांचीच काळजी घेतल्यास नक्कीच अपघाताचे प्रमाण कमी होईल, असे आवाहन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पांडुरंग सांगळे यांनी केले.
अकोले शहरात श्री विठ्ठल मोटर ड्रायव्हिंग स्कूलमार्फत वाहनचालकांमध्ये जनजागृतीसाठी रस्ता सुरक्षा अभियानाच्या फ्लेक्सचे अनावरण सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पांडुरंग सांगळे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कुणाल वाघ, निरीक्षक श्रीमती रोशनी डांगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सांगळे बोलत होते. अकोले शहरात रस्ता सुरक्षा अभियान २०२४ च्या श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व अकोले येथील श्री विठ्ठल मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने अकोले शहरात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. वाहन चालकांसाठी तयार करण्यात आलेल्या वाहतूक चिन्हे व नियमाबाबत माहिती देऊन वाहन चालवतानाचे नियमावलीचे पत्रके सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पांडुरंग सांगळे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कुणाल वाघ, निरीक्षक रोशनी डांगे आणि श्री विठ्ठल ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक हेमंत मोरे यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. तसेच शहरात विविध वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले.