श्रीगोंदा – तालुक्यातील वांगदरी येथील ३५ घरकुलांच्या पथदर्शी प्रकल्पावरून भाजप आणि काँग्रेस नेते राजेंद्र नागवडे गटामध्ये श्रेयवाद रंगला आहे. प्रकल्पासाठी आम्ही प्रयत्न केल्याचे सांगत दोन्हीही गटांनी दावे-प्रतिदावे केले आहेत. दरम्यान, रविवारी (दि.२१) पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते व आ. बबनराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.
याबाबत नागवडे गटाचे समर्थक व वांगदरीचे सरपंच संजय नागवडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वांगदरी येथील ३५ घरकुलांच्या पथदर्शी प्रकल्पासाठी अनुराधा व राजेंद्र नागवडे यांच्या प्रयत्नातून शासनाची जमीन मिळाली. शासकीय निधीत घरकुलांचे काम पूर्ण होत नसल्याने ग्रामपंचायतीने इतर फंडातून निधी खर्च केला आहे. घरकुल प्रकल्पाचे काम ग्रामपंचायतीच्या निगराणीखाली सुरू असून काही काम बाकी आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाची मदत झाल्याची आम्हाला जाणीव आहे.
मात्र अनुराधा व राजेंद्र नागवडे यांच्या प्रयत्नांतून हा प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यास आमचा बिलकुल विरोध नाही. काम पूर्ण झाल्यानंतर पालकमंत्र्यांच्याच हस्ते लोकार्पण करण्याचा आमचा मानस होता. परंतु, काम अपूर्ण असताना लोकार्पणाची घाई म्हणजे न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याची खटपट आहे. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करीत त्यावर बहिष्कार टाकत आहोत, असे सरपंच संजय नागवडे यांनी म्हटले आहे.
भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे म्हणाले, विरोधक या पथदर्शी घरकुल प्रकल्पाचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. वांगदरीतील पथदर्शी प्रकल्पाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झाला आहे. भूमिहीन कुटुंबांनाही घरकुले मिळावेत, यासाठी ‘सीएम पोर्टल’वर तक्रार दाखल केली होती. आ. बबनराव पाचपुते यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला, त्यातून घरकुलांसाठी शासनाची जमीन देण्याचा निर्णय झाला. त्याचा पथदर्शी प्रकल्प वांगदरीत उभा राहिला आहे.
ग्रामपंचायतीने या प्रकल्पासाठी १९ लाखांचा निधी दिल्याचे आम्हाला मान्य आहे. मात्र, शासकीय अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार निधी मिळूनही तो कमी कसा पडला, याचे विरोधकांनी उत्तर द्यावे. नागवडे यांनी पुढे म्हटले आहे की, विरोधकांमुळेच या घरकुलांचे काम रेंगाळले. अन्यथा यापूर्वीच लाभार्थ्यांना त्यांची हक्काची घरे मिळाली असती. विरोधकांनी भाजप सरकारने मंजूर केलेल्या घरकुल प्रकल्पाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी तालुक्याच्या राजकारणात एकत्र आलेल्या आ. बबनराव पाचपुते आणि काँग्रेस नेते राजेंद्र नागवडे यांच्या गटातील संघर्ष वांगदरी येथील घरकुल प्रकल्पाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उफाळून आल्याचे या श्रेयवादाच्या लढाईच्या निमित्ताने पाहायला मिळत आहेत.