सातारा – जिल्ह्यात खरीप हंगामात ८५ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. या पिकाला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. मात्र, यंदा उत्पादन कमी होऊनही दर वाढलेले नाहीत. गेले काही महिने सोयाबीनचा क्विंटलचा भाव पाच हजारांच्या आतच असल्यामुळे क्विंटलला जादा दराची वाट पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा असून आणखी किती दिवस सोयाबिन घरात ठेवायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे.
जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र हे सुमारे तीन लाख हेक्टर असून गेल्या वर्षी सोयाबीनचे ६८ हजार हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. प्रत्यक्षात ८७ हजार हेक्टरवर सोयाबीन पीक घेण्यात आले होते. गेल्या वर्षी काढणीच्या वेळीच दरात घसरण झाली. त्यातच अतिवृष्टीत सोयाबीनचे नुकसान झाल्यामुळे सोयाबीन काळे पडले. बाजारात काळ्या सोयाबीनला दर पाडून मागत होते. मात्र, शेतकऱ्यांनी दर वाढेपर्यंत वाट पाहिली. मागील एक वर्षापासून सोयाबीनला भाव कमी आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी ऑक्टोबरनंतर सोयाबीनचा दर वाढला. साडेपाच हजाराच्या पुढे गेला. पण, त्यानंतर दरात घसरण होवून पाच हजारांच्या खाली भाव आला. यंदाही तशीच स्थिती आहे. कारण, यावर्षीही सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात आले. मात्र, उत्पादन कमी होऊनही दर वाढलेले नाहीत. गेले काही महिने सोयाबीनचा क्विंटलचा भाव पाच हजारांच्या आतच असून दर वाढीची शेतकऱ्यांनी आशा सोडली आहे.
– यंदाही ८५ हजार हेक्टरवर पेरणी
– डिसेंबर महिन्यात क्विंटलला साडेचार ते पाच हजार दर
– दर चांगला मिळेल या आशेने तीन वर्षात सोयाबीन क्षेत्रात वाढ
– यंदा उन्हाळी सोयाबीन कमी
– गेल्या वर्षी खरीप हंगामात तब्बल ८७ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी