Ajit Pawar: पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे डॉ. अमोल कोल्हे (Amol kolhe) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी तीन दिवसीय शेतकरी आक्रोश मोर्चाची सांगता झाली. यानिमित्त महाविकास आघाडातील अनेक नेते मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. ‘आमच्या पाडापाडीच्या राजकारणात तुम्ही पडू नका, हवा तो बहुत तेज चल रही है अजितराव, टोपी उड जाएगी’ अशी टीका केली होती. त्यांच्या या टिकेला आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पुण्यातील पेरणेफाटा येथे ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांना संजय राऊत यांनी केलेल्या टिकेबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर अजित पवार यांनी “असल्या सोम्यागोम्याने बोलल्यावर मी बोलत नाही,” अशी भूमिका मांडत संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
तर अजित पवार नववर्षाच्या शुभेच्छा देताना म्हणाले की, “राज्यातील कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावी. महाराष्ट्रातला कुठलाही घटक त्याच्या लाभापासून वंचित राहू नये. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण ठीक आहे परंतु कारण नसताना विरोधाला विरोध करून काही तरी वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करायचे हे जे सुरू झाले ते काही योग्य नाही. एखादी गोष्ट चुकली असेल तर सर्व मंत्रिमंडळाची ती दुरुस्त करण्याची तयारी आहे. परंतु कारण नसताना बदनामी, गैरसमज, अफवा पसरवण्याचे काम थांबल पाहिजे, हे आपल्या महाराष्ट्राच्या हिताचे नाही.”