मुंबई – दिशा सालियन प्रकरणात शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या पाश्र्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य असे काही करेल असे वाटत नाही असे म्हणत आदित्य यांची पाठराखण केली होती. आता त्यांनी धारावी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या मोर्चावरही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. कोणी त्यांचे हात धरले होते का? असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री असताना चांगले निर्णय घ्यायला उध्दव ठाकरे यांना कोणी थांबवलं होतं का? सर्व विरोधी पक्ष नेते म्हणतायत की आरक्षण द्या.
मग त्यांनी मराठा आरक्षण का दिलं नाही? तुम्हाला कोणी थांबवलं होत? शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत बसला होतात. धारावीचा पुनर्वीकास करायचा होता. मग तुम्ही का केला नाही? असा सवाल करतानाच साहेबांनी याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांनी अदानींच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरे यांना घेरले. दीड वर्षांपूर्वी अदानी मातोश्रीवर भेटायला कशाला गेले होते हे तुम्ही शोधा, असे सूचक विधान करून शर्मिला ठाकरे यांनी खळबळ उडवून दिली आहे.
दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही शर्मिला ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे प्रकरणी शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले. त्यावरही आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.
वहिनींपेक्षा आमच्या भावना वेगळ्या नाहीत. त्यांचा त्यांनी विचार करावा, असं सांगतानाच प्रत्येक वेळी राज ठाकरे यांनी मदतीची भावना ठेवली आहे. पण त्यांनी कधी त्यांचा सन्मान ठेवला नाही. आम्ही आमची लढाई लढत आहोत, असेही ते म्हणाले.