#CWC2023 #INDvAUS Final : एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले व करंडक उंचावण्याचे स्वप्न भंग पावले. यावर बोलताना विक्रमादीत्य सुनील गावसकर यांनी रोहितने स्वतःवर नियंत्रण राखायला हवे होते असे म्हटले आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या षटकांत एक षटकार व एक चौकार फटकावलेले असूनही पुन्हा एकदा तसाच प्रयत्न करताना रोहितला झेल ट्रेव्हीस हेडने घेतला व तीथेच सामना फिरला. रोहितने तो फटका टाळायला हवा होता, असेही गावसकर यांनी म्हटले आहे.
विश्वकरंडक स्पर्धेच्या साखळी फेरीत तसेच उपांत्य लढतीत ज्या पद्धतीने रोहितने फलंदाजी केली ती अफलातून होती. त्याच्या खेळीमुळेच नंतर फलंदाजांसाठी काम सोपे ठरत होते. अंतिम सामन्यातही तो रंगात होता. त्याने मॅक्सवेलच्या त्या षटकांत एक चौकार व एक षटकार फटकावलेला होता. त्यामुळे तसाच आततायी प्रयत्न त्याने केला नसता तर सामन्याचा विकाल वेगळा लागला असता. मात्र, जर तर यावर कोणतीही गोष्ट बोलून उपयोग नसतो, असेही गावसकर यांनी नमुद केले.
पहिल्या पॉवरप्लेमध्ये क्षेत्ररक्षकांवर नियंत्रण असते. थर्टी यार्ड वर्तुळाबाहेर केवळ दोनच क्षेत्ररक्षक असतात त्याचा लाभ घेत रोहितने प्रत्येक सामन्यात वादळी फलंदाजी केली ती कौतुकास्पदच आहे. मात्र, अंतिम सामन्याचे दडपण वेगळे असते, जबाबदारी वेगळी असते व जर तूम्ही कर्णधार असाल तर या जबाबदारीत आणखी वाढ होते. हे ओळखून रोहितने कमीत कमी धोका पत्करण गरजेचे होते.
तो एक चुकीचा फटका खेळला व त्याची मोठी खेळी हुकली. अंतिम लढतीत खेळपट्टीचा चांगला अभ्यास करुन ऑस्ट्रेलियाचा संघ खेळला. त्यांचे विजेतेपदाबद्दल अभिनंदनच करीन परंतू संपूर्ण स्पर्धेत सातत्याने सरस खेळ केलेला भारतीय संघ अशा पद्धतीने पराभूत व्हावा यापेक्षा अन्य शोकांतीका काय असू शकते, असेही ते म्हणाले.
त्रिशतकी धावा सहज झाल्या असत्या…
रोहित बाद झाल्यावर विराट कोहली व लोकेश राहुल यांनी अर्धशतके फटकावली मात्र, त्यांनी कोणती जोखीमच पत्करली नाही. सावध परंतू आक्रमक फलंदाजी केली असती तर भारतीय संघ त्रिशतकी धावा सहज उभारू शकला असता व त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर दडपण आले असते, असेही गावसकर यांनी म्हटले आहे.