नाशिक – मराठा समाज प्रचंड संख्येने जमला आहे, याचे मनापासून कौतूक. मात्र, या गर्दीच्या नादात आपल्या हातून काहीही चुकीचे व्हायला नको. मराठा आरक्षणासाठी मराठा समाज एकवटला आहे, पण गर्दीच्या नादात अतिउत्साहात येऊ नका.
तुमच्या पायाला हात लावून सांगतो की, पुन्हा समाजाची हानी होईल. त्यामुळे आता समाजाची हानी होऊ देऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarang) यांनी सभेला उपस्थित मराठा समाजाला केले. तसेच मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला.
जरांगे पाटील यांनी बुधवारी, (22 नोव्हेंबर) नाशिकमध्ये महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सहभागाबद्दल भुजबळांवर सडकून टीका केली. तसेच तुमच्या एकाही कॉलेजला सावित्रीबाई फुले यांचे नाव का नाही, असा थेट सवालही केला आहे.
मनोज जरांगे छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, कुठे भाजी विकत होते, कोणाच्या इथे काय करत होते, मुंबईला येऊन काय केले, कोणत्या नाटकात काम केले, कोणत्या चित्रपटात काम केले आणि कुणाचा बंगला हडप केला
हे सगळे मला माहित आहे. त्यांनी मराठी जनतेचे खाल्ले. त्यामुळे त्यांना गोरगरीब जनतेचा तळतळाट लागला आणि ते तुरुंगात गेले. त्यांना तुरुंगात बेसन भाकर खावी लागली, अशा शब्दांत त्यांनी भुजबळ यांच्यावर आरोप केले आहेत.