Jayakwadi dam water issue : आज सर्वोच्च न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला जायकवाडी धरणात 8.6 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जायकवाडी धरणातील पाणी प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला होता. (Jayakwadi dam)
मराठवाड्यात (Marathwada water issue) दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गोदावरी खोऱ्यातील नगर आणि नाशिक जिल्ह्यातील (Nagar nashik district) जलाशयातून जायकवाडी धरणात पाणी (Dam water) सोडण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यास विरोध होऊ लागल्याने या प्रश्नावर रस्त्यावरील लढाई सोबतच आता न्यायालयीन लढाई पाहायला मिळत आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने देखील याबाबत निर्णय दिला.
यंदा मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी कमालीची घटली आहे. अशा परिस्थितीमध्ये रब्बी हंगामात दोन आवर्तने सोडण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. परंतु धरणामध्ये पुरेसा साठा नाही.
सर्वपक्षीय आंदोलन
सोमवारी भाजप वगळता सर्वपक्षीय नेत्यांनी जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनातही गोदाकाठच्या कार्यकर्त्यांचा समावेश अधिक होता. या आंदोलनात राजेश टोपे, अमरसिंह पंडित, रमेश आडसकर, माजी मंत्री अनिल पटेल यांचा प्रमुख सहभाग होता. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचे खास अशी स्वत:ची ओळख निर्माण करणारे आमदार संजय शिरसाटही आंदोलनात सहभागी झाले होते.