पुसेगाव – सातारा जिल्ह्यामध्ये सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यात पाण्याचा प्रश्न पेटणार आहे. जनतेला पाणी देण्याची प्रक्रिया प्रशासनासाठीही अवघड बनणार आहे. याबाबत विचार विनिमय करून वीज निर्मिती थांबवून पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची व्यवस्था करावी लागेल. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबवावा, अशी मागणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना केली.
माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा, फलटण अशा अर्ध्या जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याची झळ आता सर्वसामान्य शेतकरी व ग्रामस्थांना भोगावी लागत आहे. दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील ओढे, नाले व नदीपात्र तसेच धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी आमच्या धरणातून पाणी सोडू नये, अशी मागणी लोकप्रतिनिधी स्थानिक जनतेच्या दबावपोटी करत आहेत. तसे पाहिले तर कोयना धरणाच्या 67 टक्के पाणीसाठा वीजनिर्मितीसाठी उपयोगात आणला जातो. वास्तविक वीजनिर्मितीसाठी हायड्रोपॉवर, सोलर व पवनचक्की यातून वीजनिर्मिती करणे शक्य झाले आहे. मानवनिर्मित प्रयत्नामुळे पर्याय उपलब्ध झाल्यामुळे खऱ्या अर्थाने क्रांती घडलेली आहे. जगामध्ये अनेक प्रयोग यशस्वी झाले.
परंतु, पाणी तयार करण्याचा प्रयोग झालेला नाही. त्यामुळे पाणीनिर्मितीला दुसरा कुठलाही पर्याय नाही. अशा वेळी पाण्याची बचत करणे व हे पाणी सामान्य माणसाची तहान भागवण्यासाठी देणे हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रायोगिक तत्त्वावर आणि निर्मितीसाठी लक्ष घालावे, अशी मागणी होऊ लागली आहे. दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू झालेले आहेत. चारा छावणीची भविष्यात मागणी होणार आहे. चारा छावणी सुरू झाली तर दोन माणसं या छावणीमध्ये अडकून पडणार आहेत.
अशा वेळेला पर्याय शोधणे म्हणजे नवनिर्मिती करणे. या अनुषंगानेच श्री. प्रभाकर घार्गे यांनी सुचवलेल्या पर्याय बाबत राज्य शासनही गांभीर्याने विचार करत आहे, ही जमेची बाजू आहे. यामध्ये वैज्ञानिकदृष्ट्या विचार करूनच पाऊल उचलावे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, माण खटावचा दुष्काळ नाहीसा करण्यासाठी पूर्वी प्रायोगिक तत्त्वावर आपण लातूरला रेल्वेने पाणी देऊ शकतो मग इतर मार्गाने पाण्याची बचत करून ते पाणी वापरात येऊ शकते. हेच प्रयोगाचे यश ठरणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.