Jalgaon Accident : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील (Amalner Jalgaon)मांडळ गावावर ऐन दिवाळीत दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कारण या गावाच्या सहा जणांचा राजस्थानमध्ये कार (Amalner Rajasthan Car Accident) अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. शिक्षकांचे कुटुंबीय या अपघातात मृत्युमुखी पडले असून मृतांचे नातेवाईक घटना कळताच राजस्थानकडे रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अमळनेर तालुक्यातील मांडळ गावचे दोन शिक्षकांचे कुटुंब राजस्थान मधील जैसलमेर येथे फिरायला जात होते. त्यावेळी कंटेनरला धडक लागून सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मांडळ येथील शिक्षक धनराज नगराज सोनवणे (वय 55, रा. बेटावद) आणि योगेश धोंडू साळुंखे (रा. अर्थे. ता. शिरपूर, हल्ली मुक्काम पिंपळे रोड, अमळनेर) या दोन्ही शिक्षकांचे कुटुंब एका गाडीत आणि दिनेश सूर्यवंशी यांचे कुटुंब एक गाडीत अशा दोन चार चाकींतून राजस्थान फिरायला गेले होते.
आज, १३ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बारमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ एका कंटेनरला त्यांच्या वाहनाची धडक बसली. डोरीमना गावाजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सोनवणे आणि सांळुखे असलेल्या कारने एका कंटेनरला धडक दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात धनराज सोनवणे, त्यांची पत्नी सुरेखा धनराज सोनवणे (वय 50), मुलगी स्वरांजली धनराज सोनवणे (5 वर्षे) , गायत्री योगेश साळुंखे (वय 30), प्रशांत योगेश साळुंखे (वय 7), भाग्यलक्ष्मी साळुंखे (वय 1) यांचा जागीच मृत्यू झाला.
पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर सुरेखा ह्या जखमी होत्या. त्यांची रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे. धोरिमाण्णा पोलीस ठाण्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने घटनास्थळी पोहोचून कारमध्ये अडकलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढले. सर्व मृतदेह धोरिमान्ना हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, या मृतांचे मृतदेह मंगळवार (दि. 14 नोव्हेंबर) धुळे जिल्ह्यात बेटावद आणि चीमथाणा येथे त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार असून त्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.