नवी दिल्ली – देशातील बहुचर्चित बाटला हाऊस एन्काउंटर प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी दोषी आरिज खानला सुनावलेली फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याचा निर्णय दिला आहे. या प्रकरणी 2021मध्ये सत्र न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेचा निर्णय बदलला आहे.
अटकेनंतर आरिझ खानला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सत्र न्यायालयाने त्याला 15 मार्च 2021 रोजी मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली. तसेच या शिक्षेच्या पुष्टीसाठी सत्र न्यायालयाने हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयाकडे सुपूर्द केले. दिल्ली उच्च न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी घेऊन 18 ऑगस्ट 2023 रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. न्या. सिद्धार्थ मृदूल आणि न्या. अमित शर्मा यांच्या खंडपीठाने आरिझ खान याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
दिल्लीत 2008मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर काही दिवसांनी पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडून माहिती मिळाली की बाटला हाऊस येथे काही दहशतवादी लपून बसले आहेत. या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी बाटला हाऊसवर छापा टाकला. यावेळी पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा शहीद झाले तर पोलीस कर्मचारी बलवंतसिंह राजवीर जखमी झाले होते.
दरम्यान, पोलिसांनीही प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात आतिफ अमीन आणि मोहम्मद साजिद हे दोन दहशतवादी ठार झाले. या धुमश्चक्रीत आरोपी आरिझ खान तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरला. परंतु, पोलिसांनी त्याला 2018मध्ये नेपाळमधून अटक केली. बाटला हाऊसमध्ये लपून बसलेला आणखी एक आरोपी शहजाद अहमद याला पोलिसांनी एन्काउंटरच्या दिवशीच अटक केली. त्याला 2013मध्ये न्यायालयाने शिक्षा सुनावली.