कोलंबो :- पाकिस्तान क्रिकेट मंडळाला एकाच स्पर्धेतून संपूर्ण वर्षभराची कमाई करायची आहे का? आशिया करंडक स्पर्धेतील सामन्यांच्या तिकिटांचे दर पाहिले की असेच वाटते, अशा शब्दात श्रीलंकेचा महान गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याने पाकिस्तान क्रिकेट मंडळावर ताशेरे ओढले आहेत.
आशिया करंडक स्पर्धा पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळवण्यात येत असली तरीही त्याचे आयोजन श्रीलंका क्रिकेट मंडळही हायब्रीड पद्धतीने करत आहे. मात्र, या स्पर्धेच्या तिकिटांचे दर काय असावेत याबात श्रीलंका क्रिकेट मंडळाला निर्णयाचा अधिकार नाही. त्यामुळे पाक मंडळाने तिकिटांचे दर कमी ठेवणे गरजेचे होते. सामन्यातील सामान्य क्रिकेटप्रेमींनाही परवडतील असे दर ठेवले असते तर प्रत्यक्ष सामन्यात रिकाम्या खुर्च्या पाहण्याची वेळ आली नसती, अशी टीकाही त्याने केली आहे.
जागतिक क्रिकेटमधील सर्वात रोमहर्षक लढत म्हणून भारत व पाकिस्तान यांच्यतील सामन्याकडे पाहीले जाते. मात्र, या स्पर्धेत साखळी तसेच सुपर फोर गटाच्या सामन्यांतही प्रेक्षक विरळाच होते. साध्या तिकिटाची किंमत 6 हजार रुपये तर ग्रॅंड स्टॅण्डच्या एका तिकिटाची किंमत तब्बल 40 ते 50 हजार श्रीलंकन रुपये आहे. इतकी मोठी रक्कम खर्च करुन कोण येणार आहे सामना पाहण्यासाठी, असा सवालही त्याने केला आहे.
स्पर्धेचे यजमान पद पाकिस्तानकडे असल्यामुळे त्यांनीच तिकीटाचे दर निश्चित केले आहेत. श्रीलंका सध्या आर्थिक संकटातून जात आहे. तिकीटाच्या किंमती खूप जास्त आहेत. हा तिकीट दर एका व्यक्तीच्या महिन्याच्या वेतानाएवढा आहे. श्रीलंकेतील क्रिकेट चाहते मोठ्या रकमेच्या तिकीट दरामुळे मैदानाकडे पाठ फिरवत आहेत, असेही मुरलीधरन म्हणाला.
भारताच्या विजयाला प्रेक्षकांमुळे गालबोट…
श्रीलंकेचा पराभव झाल्यावर भारतीय प्रेक्षकांनी आनंदोत्सव साजरा करायला सुरुवात केली. त्यामुळे श्रीलंका संघाचे चाहते संतापले व त्यांच्यात प्रचंड शिवीगाळ व धक्काबुक्की झाली. स्थानिक पोलीस यंत्रणा व सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.