कोपरगाव- मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी कोपरगाव येथे मराठा समाज बांधवांचे आमरण उपोषण सुरू आहे. आ. आशुतोष काळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आत्मदहन न करण्याची केलेली विनंती उपोषण करणाऱ्या बांधवांनी मान्य करून आत्मदहन करण्याचा निर्णय मागे घेतला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी कोपरगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी ऍड.योगेश खालकर, अनिल गायकवाड, विनय भगत या समाज बांधवानी उपोषण सुरू केले असून त्यांच्या समवेत मराठा समाज बांधव देखील साखळी पद्धतीने उपोषण करीत आहे. मराठा समाजाच्या मागण्यांची दखल न घेतल्यास शनिवारी (दि.16) आत्मदहन करण्याचा इशारा उपोषणकर्ते यांनी प्रशासनाला दिला होता. त्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. महायुती शासन मराठा समाजाच्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन त्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी आत्मदहन करण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली. ही विनंती मान्य करू उपोषणकर्त्यांनी आत्मदहनाचा निर्णय मागे घेतला आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती काहीशी खालावली असून डॉक्टरांनी उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची योग्य काळजी घ्यावी, अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार संदीपकुमार भोसले, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर, जेलर चंद्रशेखर कुलथे, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, पद्मकांत कुदळे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, कारखान्याचे संचालक ऍड. राहुल रोहमारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, कृष्णा आढाव, फकिर कुरेशी, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, गौतम बॅंकेचे माजी संचालक सुनील शिलेदार आदींसह समाजबांधव उपस्थित होते.