संतोष पवार
सातारा – जनावरांच्या लंपी स्किन या गंभीर आजाराबाबत पशुसंवर्धनच्या येथील उपायुक्त कार्यालयाकडून देण्यात येणारी माहिती अपुरी आणि बनवाबनवीची असल्याचे मागील काही अहवालांचे निरीक्षण केल्यानंतर दिसून येत आहे. “लंपी’बाबत उपायुक्त कार्यालयाकडून “झाकाझाकी’ होत असण्याची शक्यता असून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या “बुस्टर डोस’ची या विभागाला गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी लंपी स्किनच्या संकटाचा तत्कालिन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी धीराने सामना केला. मोठ्या प्रमाणात बाधित आणि मृत्यूचे प्रमाण असतानाही कुठेही लपवालपवी केली नाही. यावर्षी या आजाराची माहिती देण्यातही टाळाटाळ होत असल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात पशुसंवर्धन विभाग विविध योजना प्रभावीपणे राबवून पशुपालकांना आधार देण्याच काम करत आहे. करोना काळातही या विभागाने केलेले काम चांगले होते.
गतवर्षी लंपीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर या विभागाने मोठ्या धैर्याने त्याचा सामना केला. सुट्टीही न घेता केलेल्या कामामुळे लंपीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात यश आले. तरही लंपीचे मृत्यू रोखण्यात यश आले नव्हते. मोठ्या प्रमाणात जनावरांचा मृत्यू झाल्याने पशुपालक संकटात होते. मात्र, पशुसंवर्धन विभागाने एकही दिवस सरकारला, जिल्हा प्रशासनाला अथवा प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती दिली नाही. कुठेही आकड्यांची बनवाबनवी दिसली नाही. याउलट पशुपालकांना गतीने मदत मिळवून देण्यात जिल्हा अग्रेसर राहिला होता. यावर्षी मात्र पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्त कार्यालयाकडून समन्वयाचा अभाव आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, प्रसारमाध्यमांना अपूर्ण आणि आकड्यांची तोडफोड केलेली माहिती दिली जात आहे. उपायुक्त कार्यालयाने गतवर्षी बाधित तालुका, बाधित गावे, बाधित जनावरे, बरी झालेली जनावरे, मृत जनावरांची गावनिहाय संख्या, लसीकरणाची तालुकानिहाय आकडेवारी दिली. यावर्षी मात्र अशी माहिती दिली जात नाही. त्यामुळे या आकडेवारीत गोलमाल असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा निरुत्साह की जाणीवपूर्वक असे केले जात आहे याचा शोध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज
सध्या डॉ. विजय सावंत यांच्याकडे उपायुक्तपदाचा कार्यभार असून जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी म्हणून डॉ. विनोद पवार जिल्हा परिषदेत दुसरी टर्म करत आहेत. दोन्ही अधिकारी अनुभवी आहेत. त्यांच्याकडे “लंपी’ची परिपूर्ण माहिती मागूनही ते देऊ शकत नाही. अधिकाऱ्यांपेक्षा कोणी कर्मचारी शिरजोर झाला आहे की काय असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत असून संबंधितांना शिस्त लावून अडचणीतील पशुपालकांना आधार देण्याचे विधायक काम व्हावे यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.