नवी दिल्ली – आपला नसलेल्या भूभागावर दावा सांगणे, ही चीनची जूनी सवय आहे. त्यामुळे नुसता नकाशा प्रसिद्ध करून काहीही होणार नाही. चीनने भारताचा भूभाग आपला म्हणून नकाशामध्ये दाखवला असला, तरी हा भाग निर्विवादपणे भारताचाच आहे.
यामध्ये काहीही फरक पडणार नाही, अशा शब्दांमध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनने नवीन नकाशातून अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनबाबत केलेला दावा फेटाळून लावला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जयशंकर यांनी चीनच्या नकाशावरील प्रतिक्रिया दिली आहे.
चीनने 28 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या नकाशामध्ये अरुणाचल प्रदेश आणि 1962 च्या युद्धात बळकावलेला अक्साई चीन हे चीनचे भूप्रदेश असल्याचे दाखवले आहे. या नकाशामधे तैवान आणि दक्षिण चीन समुद्रालाही चीनच्या हद्दीत दाखवले गेले आहे.
अशा प्रकारे भारताच्या भूभागांवर दावा सांगण्याची चीनची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी चीनने भारतातील 11 ठिकाणांना चिनी भाषेतील नावे दिली होती. यामध्ये पर्वत शिखरे, नद्या आणि रहिवासी भूभागांचाही समावेश आहे.
यापूर्वी 2017 आणि 2021 मध्ये चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने भारतातील भूभागांना चिनी भाषेतील नावे दिली होती. त्यावर भारत सरकारने जोरदार टीका केली होती. चीनचे हे धोरण चिनी विस्तारवादाचे प्रतिक असल्याचे सरकारने म्हटले होते.