पुसेगाव -खटाव तालुक्यात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे. गादेवाडी (ता. खटाव) येथील शेतकरी जनार्दन हणमंत साळुंखे यांच्या शेतातील 50 हजार रुपये किंमतीचे आले रात्रीच्या वेळेस चोरीला गेल्याने साळुंखे यांना मोठा फटका बसला. या चोरट्यांचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील अनेक शिवारांमधून आल्याची चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यात आले चोरी करणारी टोळी सक्रिय होऊ लागली आहे.अगोदरच दुष्काळाच्या झळा बसू लागल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातून कसाबसा शेतमाल जगवण्यासाठी शेतकऱ्यांचा लढा सुरू असताना आता तो बाजारात कसा विकला जाईल हा प्रश्न त्याला भेडसावू लागला आहे.
गाळलेल्या घामाचे दोन पैसे मिळतील अशी परिस्थिती असताना चोरटे आता या शेतमालावर डल्ला मारू लागले आहेत. खरं तर खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर आता रात्रीच्या वेळी शेतमालावर पहारा देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता आम्हीं काय शेतात सीसीटीव्ही लावायचे का? असा संतप्त प्रश्न परिसरातील शेतकरी विचारू लागले आहेत.