लाहोर :- भारतीय संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडून काढून घेतल्यामुळेच सध्या भारतीय संघ कमकुवत संघांविरुद्धही पराभूत होत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील पराभव हेच स्पष्ट करत आहे, असे मत पाकिस्तानचा माजी कसोटीपटू रशिद लतिफ याने व्यक्त केले आहे.
कोहलीकडे एक व्हिजन आहे, त्याच्या हाती नेतृत्व आल्यावरही त्याने हे दडपण व्यवस्थित हाताळले होते. तसेच त्याची वैयक्तिक कामगिरीही संघाला पूरक ठरत होती. मात्र, त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतल्यावर नवोदित कर्णधार रोहित शर्मा असेल किंवा हार्दिक पंड्या यांच्याकडे ती व्हिजनच नाही, असेही लतिफ म्हणाला.
दरम्यान, भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचा शेवट अपेक्षेप्रमाणे झाला नाही. टी-20 मालिकेतील पाचव्या सामन्यात संघाला 8 गडी राखून पराभूत करत वेस्ट इंडिजने तब्बल 17 वर्षांनंतर भारतीय संघाविरुद्धची मालिका जिंकली. वेस्ट इंडिज संघाला अशाच एका मालिका विजयाची गरज होती. कारण त्यांना एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेची पात्रता मिळवता आलेली नाही त्यामुळे त्यांच्यावर सातत्याने टीका होत आहे.