नवी दिल्ली – कॉग्रेससह ‘इंडिया’तील तमाम घटक पक्षांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेवून मणिपूर हिंसाचार प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात 31 खासदारांचा समावेश होता. यात मणिपूरचा दौरा करून परत आलेल्या खासदारांचाही समावेश आहे.
इंडियाच्या घटक पक्षांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिलेल्या निवेदनात मणिपूर हिंसाचार प्रकरणात ताबडतोब लक्ष घालण्याची आणि संसदेत नियम 267 अंतर्गत चर्चा घडवून आणण्याची विनंती केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने पीडित समाजाला न्याय मिळवून देण्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. मणिपूरमधील सद्यस्थितीवर तत्काळ संसदेला संबोधित करण्यासाठी पंतप्रधानांवर दबाव आणावा, त्यानंतर या विषयावर सविस्तर आणि सर्वसमावेशक चर्चा व्हावी अशी आमची विनंती आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, राष्ट्रपतींना भेटलेल्या आजच्या शिष्टमंडळात मणिपूरचा दौरा करणारे 21 खासदारही होते. राष्ट्रपतींना मणिपूरच्या परिस्थितीची माहिती देण्यात आली आणि लेखी निवेदन देण्यात आले. राष्ट्रपती आपच्या मागण्यांकडे नक्कीच लक्ष देतील अशी आम्हाला आशा असल्याचेही खर्गे यावेळी म्हणाले.
‘इंडियाच्या 21 खासदारांचे शिष्टमंडळ 29-30 जुलै रोजी मणिपूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर गेले होते. विरोधी पक्षांच्या खासदारांनी जातीय हिंसाचार पीडितांना भेटण्यासाठी अनेक मदत शिबिरांना भेट दिली. यावेळी शिष्टमंडळाने चुरदाचंदपूर येथील मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या कुकी समाजातील पीडितांची भेट घेतली.
लोकसभेतील कॉंग्रेस संसदीय पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी खासदारांचे पथक मणिपूरला गेले. शिष्टमंडळाच्या भेटीच्या आधारे तयार केलेला अहवाल सुपूर्द करण्याबरोबरच विरोधी पक्षनेते मणिपूरमधील परिस्थिती सामान्य करण्यासाठी काही ठोस पावले उचलण्याच्या सूचनाही निवेदनात करण्यात आल्या आहेत.