नवी दिल्ली – प्रवाशांना यापुढे टोल बूथवर जास्त वेळ थांबावे लागणार नाही, कारण सरकार लवकरच टोल मुक्त प्रणाली आणण्याच्या विचारत आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते आणि महामार्ग राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी दिली. तसेच अडथळ्यांशिवाय टोल मुक्त प्रणालीसाठी चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत.
आमच्या चाचण्या यशस्वी होताच आम्ही त्याची अंमलबजावणी करू. यामुळे वाहन चालकांना टोल बूथवर अर्धा मिनिटही थांबावे लागणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना व्ही. के. सिंह म्हणाले की, वाहतूक चालकांनी प्रवास केलेल्या किलोमीटरवर आधारित पेमेंट प्रणालीकडे देश वाटचाल करेल. नवीन टोल प्रणालीत सुधारणा करण्यात येण्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. व्ही. के. सिंह यांनी सांगितले की, फास्टॅगच्या वापरामुळे टोल बूथवर वाहन चालकांची प्रतीक्षा वेळ 47 सेकंदांपर्यंत कमी करण्यात मदत झाली आहे, परंतु ही प्रतीक्षा वेळ कमी करून ती 30 सेकंदांपर्यंत करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
सध्या दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गावर एक पायलट प्रकल्प आधीच सुरू आहे. याठिकाणी काही उपग्रह आणि कॅमेरा आधारित तंत्रज्ञानाची चाचणी सुरू करण्यात आली आहे. यामुळे वाहन चालक जेव्हा महामार्गावर प्रवेश करेल, तेव्हा त्याच्या वाहनाची नोंदणी प्लेट कॅमेराद्वारे स्कॅन केली जाईल आणि वाहन चालकाचा डेटा संकलित होईल. यानंतर वाहन चालकाने प्रवास केलेल्या किलोमीटरसाठी शुल्क आकारले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
वाहन चालकाने 265 रुपये भरले तर, त्यांनी प्रवास केलेल्या किलोमीटरसाठी त्यांच्याकडून शुल्क आकारले जाणार नाही. त्यांचा प्रवास सशुल्क टोल नियमावर आधारित होणार आहे. दूरसंचारसह विविध क्षेत्रात सध्याच्या सरकारने केलेल्या कामांमुळे ही सर्व प्रगती होत असल्याचे ते म्हणाले.