नवी दिल्ली : मणिपूरवर हिंसाचारानंतर आता एका नव्या संकटाचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण राज्यात हिंसाचार झाल्यानंतर 22 आणि 23 जुलै रोजी म्यानमारच्या 700 पेक्षा जास्त नागरिकांनी अवैधरित्या मणिपूरमध्ये घुसखोरी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संबंधित अधिकाऱ्यांना माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान या नागरिकांनी कागदपत्रांशिवाय राज्यात कसा प्रवेश केला आणि त्यांना येथे येण्याची परवानगी कोणी दिली ही माहिती राज्य सरकारने मागितली आहे. गृहविभागाने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांमध्ये जवळपास 718 म्यानमारच्या नागरिकांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय भारतात कसा प्रवेश करण्याची परवानगी कशी देण्यात आली यासंबंधीचा अहवाल राज्य सरकारने आसाम रायफल्सकडे मागितला आहे. आसाम रायफल्स हे सीमेवर सुरक्षेची जबाबदारी पार पडत असतात. त्यामुळे मणिपूर सरकारने आसाम रायफल्सकडे उत्तर मागितले आहे. दरम्यान ज्या म्यानमारच्या नागरिकांनी भारतात प्रवेश केला आहे त्यांच्याजवळ दारुगोळा आणि हत्यारे तर नाही ना ही चिंता राज्य सरकारला लागून राहिली आहे.
आसाम रायफल्सच्या सेक्टर 28 कडून 718 म्यानमार नागरिकांनी सीमा ओलांडून चंदेल मार्गे मणिपूरमध्ये प्रवेश केल्याची माहिती देण्यात आली. यावर मणिपूर सरकारचे म्हणणे आहे की, या प्रकरणी आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला असून यासोबतच म्यानमारच्या या नागरिकांना परत पाठवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मणिपूरमध्ये दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरु असलेल्या हिंसाचाराच्या काळात म्यानमारमधील या घुसखोरांनी आपल्यासोबत दारुगोळा आणि शस्त्रे आणलेली नाहीत, याचीही सरकारला चिंता आहे.
मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचाराचे सत्र सुरु आहे. मेईती आणि कुकी या दोन जातींमध्ये सध्या जातीय दंगली सुरु आहेत. मणिपूरमध्ये सुरु असलेल्या या हिंसाचारामध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार देखील उघडकीस आला आहे. दरम्यान यासंदर्भात राज्य सरकारकडून आरोपींना कठोर शिक्षा करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. दरम्यान पोलिसांनी देखील आरोपींना ताब्यात घेतले आहे.