वाई – आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस सक्षम उमेदवार देणार आहे, अशी माहिती जिल्हा कॉंग्रेस समितीचे प्रभारी व प्रदेश सरचिटणीस श्रीरंग नाना चव्हाण पाटील यांनी दिली.
प्रदेश कॉंग्रेसच्या निर्देशानुसार वाई तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत श्रीरंग नाना चव्हाण पाटील बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला अध्यक्षा सौ. अल्पना यादव, प्रदेश युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस व चांदवडीचे लोकनियुक्त सरपंच जयदीप दादा शिंदे, सेवादल जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, कॉंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सुनील बाबर, कार्याध्यक्ष प्रदीप जायगुडे, जिल्हा सरचिटणीस अतुल संकपाळ, जिल्हा सदस्या सौ. मंजिरी पानसे, सौ. माधवी तांबे, सेवादलाचे वाई तालुकाध्यक्ष काशिनाथ पिसाळ, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष ऍड. समीर इनामदार, विधानसभा युवक अध्यक्ष सचिन काटे यांची प्रमुख उपस्थिती होती. वाई तालुक्यातील केंजळ, पसरणी, बावधन व उडतरे या चार ठिकाणी तालुकाध्यक्ष विलास पिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठका आयोजित करण्यात आलेल्या होत्या.
श्रीरंग नाना चव्हाण म्हणाले, “देशामध्ये सध्या सत्ताधारी असलेले भाजपचे सरकार हे हिन दर्जाचे राजकारण करू लागले आहे. लोकशाहीचे मूल्य पायदळी तुडवून देशाला हुकुमशाहीच्या बाजूने नेण्याचे काम सध्याचे केंद्रातील सरकार करत आहे. भीती घालून, दबाव टाकून पक्ष फोडण्याचे कारस्थान चालू आहे, मणिपूरमध्ये भाजपची सत्ता आहे. तिथे प्रचंड दंगली सुरू आहेत. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. तरीही केंद्र सरकार आणि तिथले राज्य सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे. पंतप्रधान मणिपूरबद्दल बोलायला तयार नाहीत. या सर्व घटनांचा देशातील जनतेला उबग आला आहे. जनतेला आता कॉंग्रेसचे महत्त्व पटू लागले आहे.” देश एकसंध ठेवण्यासाठी आणि जगात देशाची प्रतिमा पुनर्स्थापित करण्यासाठी कॉंग्रेसशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.
त्यामुळे यावेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी आली आहे. आता कामाला लागा. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, विधानसभा निवडणुकीसाठी नव्या दमाचे उमेदवार उभे करायचे आहेत, असे श्रीरंग चव्हाण यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, अल्पना यादव, जयदीप शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यांनी मते या बैठकांमध्ये खुल्या दिल्याने मांडली. यावेळी सुरेश भाऊ जगताप, अभिजीत जगताप, प्रकाश शिंदे, रामदास शिर्के, संदीप नेवसे, हनुमंत दादा पिसाळ, सतीश जाधव, बाळासाहेब बरकडे, शरद पनवेलकर, संतोष पाटणे, कुणाल बाबर, महेश ढगे, अन्सार भाई मुजावर, फैयाज बागवान, अरुण शिंदे आदी प्रमुख कार्यकर्ते व गावोगावचे नागरिक उपस्थित होते.