अरुण पवार
पाटण – पाटण तालुक्यातील कोयना आणि मोरणा विभागातील ढोकावळे, आंबेघर, मिरगांववर दोन वर्षांपूर्वी याच दिवशी निसर्ग कोपला. गावांतील लोक गाढ झोपेत असतानाच सुमारे 18 जणांनी जीव गमावले. गावाशेजारील दरड आणि डोंगर घरावर कोसळून ही दुर्घटना घडली होती. या आपत्तीला जवळपास दोन वर्षे पूर्ण झाली असून अद्यापही वाचलेल्या आपतग्रस्तांना शासनाकडून कायमस्वरूपी घरे मिळालेली नाहीत, ही शोकांतिका आहे. त्या घटनेतून वाचलेले नागरिक आजही निवाऱ्यासाठी इकडे- तिकडे शोध घेत आहेत.
पाटण तालुक्यातील जनतेचे मन सुन्न करणारी अशी घटना यापूर्वी तालुक्यात कधी घडली नव्हती. या घटनेमुळे माळीण गावाची आठवण झाली. अशी वेळ आपणावर येईल, याची कल्पनाही ग्रामस्थांच्या मनात येऊन गेली नसावी. 21 जुलै 2021 च्या रात्री पाऊस धो धो कोसळत होता. घराबाहेर येणेही मुश्किल होते. अंधार पसरला होता. जग रहाटीप्रमाणे आंबेघर, ढोकावळे व मिरगाव या गावातील लोकही आपापल्या लहान मुलाबाळांसह गाढ झोपेत होते. त्यांना ठाऊक नसावे, काळ आपल्या जवळ येवून थांबला आहे आणि अचानक डोंगर घरावर कोसळल्याने होत्याचे नव्हते झाले. आंबेघर, मिरगाव व ढोकावळे वस्त्या नाहीशा झाल्या. यामध्ये 18 जणांना आपले जीव गमावावे लागले.
आंबेघरची ती वस्ती मोरणा- गुरेघर धरणापासून डोंगराकडे सरकून होती. नियतीच्या मनात काय होते, हे तिलाच ठाऊक. कारण, मध्यरात्री झालेल्या घटनेमुळे आंबेघरची सर्वच घरे गाडली गेली. त्या रात्री त्या वस्तीमध्ये नसणारे तेवढे वाचले. भयानक घटना घडूनही पाऊस जोराचा कोसळत होता. भल्या मोठ्या डोंगराची माती, दगड- गोटे पाण्याच्या प्रवाहात एका मागून एक वाहून जात होते.
तेथे जायला सुद्धा मार्ग नव्हता. सकाळी या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. आसपासच्या गावातील सर्व लोक तिकडे धावले. मात्र करणार काय? मोरणा नदी तुडुंब वाहत होती. तरीसुद्धा दुसऱ्या मार्गे पलीकडे गेल्यावर घटनास्थळावर जाण्यासाठी पायवाट उरली नव्हती. नंतर प्रशासनाने एनडीआरएफच्या टीमच्या मदतीने आणि स्थानिक लोकांच्या सहकार्याने त्या जागेवर जाण्यास यश मिळवले. तत्कालीन आमदार शंभूराज देसाई हे सुद्धा मोठ्या प्रयत्नाने घटनास्थळी पोचले होते.
दोन दिवसानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. लोकांना तात्पुरता निवारा देण्यात आला. कोयना विभागातील मिरगाव, ढोकावळे येथेही दरडी कोसळून सहा लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पाटण तालुक्याने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले होते. त्यावेळचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट दिली होती.