तो आला, त्याने पाहिले, त्याने जिंकले… नाव जतीन खन्ना, पण आपण ओळखतो राजेश खन्ना या नावाने. पंजाबमधील बुरावाला हे त्यांचे मूळ गाव. जवळच्या नातेवाईकाने दत्तक घेतल्याने खन्ना झाले आणि मामाने पुढे जतीनचे राजेश केले. दिलीपकुमार यांना ट्रेजडी किंग, देवानंदना चॉकलेट हिरो, धर्मेंद्रना ही मॅन, अमिताभना अँग्री यंग मॅन अशी त्यांच्या व्यक्तिमत्त्व व अभिनयाला साजेशी बिरुदं त्यांना चिकटली असली तरी “सुपरस्टार’ ही उपाधी मिळाली ती राजेश खन्ना यांना. सुपरस्टार राजेश खन्ना यांचा 18 जुलैला अकरावा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने…
एकोणीसशे पासष्टमध्ये सिनेसृष्टीला राजेश खन्नांचा शोध लागला. युनायटेड प्रोड्यूसर संस्थेने भारतभरातील आठ हजार उमेदवारांमधून राजेश खन्नांची निवड केली गेली. मुंबई गिरगावमध्ये वाढलेले राजेश खन्नांचे कुटुंब हे सुखवस्तू, त्यामुळे नवागत असले तरी राजेश खन्ना आपल्या तोऱ्यातच असत. सेटवर उशिरा येण्याची आपली सवय त्यांनी पहिल्या दिवसापासून जपली. चेतन आनंदनी त्यांना घेऊन बनविलेला “आखरी खत’ हा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला आणि सपशेल आपटला. नंतरच्या राज, बहारोंके सपने, औरत इत्यादीने अपयशाचे डाग ठळकच केले.
कामाची वानवा असल्यामुळे सलग तारखा देता आल्या आणि त्यामुळे “इत्तेफाक’ सिनेमा पदरी पडला. या सिनेमाने मात्र थोडी धुकधुकी कायम ठेवली. याच वेळी निर्माते शक्ती सामंत एका सिनेमाची जुळवा जुळव करीत होते. नायक म्हणून शम्मी कपूर अभिप्रेत होते, पण त्यांचं वजन वाढलेले होते आणि दुसरे, चित्रपट स्त्री प्रधान असल्याने भूमिका करण्यास खास असे कोणी इच्छुक नव्हते. मग ही भूमिका राजेश खन्नांकडे आली. सिनेमाचे नाव होते “आराधना’. एकोणीसशे एकोणसत्तरचा तो काळ. सिनेमा प्रदर्शित झाला. सुरुवात निराशाजनक झाली, पण आठवडा संपता संपता प्रेक्षकांचे पाय थिएटरकडे वळू लागले आणि बघता बघता सिनेमा सुपर हिट ठरला.
या सिनेमाने राजेश खन्ना बरोबरच किशोरकुमारलाही जीवदान दिले. आराधना पाठोपाठच्या दो रास्ते, सच्चा झूठा आदी सिनेमांनी जणू राजेश खन्नाकडे सिनेसृष्टीचा ताबाच बहाल करून टाकला. पुढील पाच वर्षे त्यांनी सिनेसृष्टीवर निर्विवाद हुकूमत गाजवली. इंडस्ट्रीत जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी राजेश आणि राजेशच वावरू लागला. या चार-पाच वर्षांत जन्मलेली बहुतेक मुलांची नावे पालकांनी राजेश ठेवली. त्याकाळी “उपर आका और नीचे काका’ या पद्धतीने त्यांची स्तुती केली जाई.
या यशाने त्यांच्या डोक्यात हवा भरून टाकली, असा आरोप केला गेला पण याच राजेश खन्नांनी हृषीकेश मुखर्जींचा “आनंद’ सिनेमा ते देतील तेवढे मानधन आणि ते मागतील ती तारीख देऊन मिळविला. आनंदने त्यांच्यातील गंभीर अभिनेता लोकांसमोर आणला. गुरू कुर्ता आणि नॅरो बॉटमची पॅन्ट त्यांच्यातील टवटवीतपणा जपत. ते नाचतात म्हणजे नेमके काय करतात हे अनाकलनीय असले तरी त्यांच्या नृत्य शैली तरुणांच्या पायांना ठेका धरायला लावत. चेहऱ्यावर विसावलेली निरागसता, थोडी वेगळी केश रचना, गोरे गोमटे व्यक्तिमत्त्व, मर्यादित उंची, आश्वासक नजर आणि यावर कडी करणारी अदा. तरुणींना वेड लावण्यास पुरेशी ठरत. त्यांचे आकर्षण, तरुणाईचे लोंढेचे लोंढे सिनेमागृहकडे आणत. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच डिंपल बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. एव्हाना डिंपलचा “बॉबी’ हिट झाला होता. पण डिंपलने प्रेमापोटी सिनेमांचा त्याग केला.
दरम्यान, बंगला विकत घेण्याचे ठरले. अभिनेता राजेंद्रकुमार यांचा तो बंगला. एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा तो काळ. या बंगल्याचे आर्थिक गणित जमविण्यासाठी त्यांनी भरमसाठ सिनेमे स्वीकारले. त्यात “हाथी मेरे साथी’ची स्क्रिप्ट तर न वाचताच साइन केली. सिनेमात चार चार हत्ती असल्याने मला काय भूमिका उरेल? ही भीती नंतर उभी राहिली, मग लेखक जावेदनी त्या सिनेमात गरजेचे बदल केले. एकीकडे अविष्कार, खामोशी सारखे हृदय पिळवटून टाकणारे सिनेमे येत होते, तर त्याबरोबरच बावर्ची, आनंद, अनुराग सारखे आशयघन तसेच अंदाज, दुश्मन, दाग, आन मिलो सजना, कटी पतंग, दी ट्रेन, नमक हराम, अजनबी इत्यादी सिनेमे त्यांच्या लोकप्रियतेत भर घालत होते. रेडरोज, धनवान मधील नकारात्मक भूमिकाही दर्शकांना पसंत पडल्या. त्यांच्या संसारवेलीवर ट्विंकल आणि रिंकी अशा दोन कळ्या उमलल्या.
एव्हाना अमिताभ बच्चन यांचा उदय झाला होता. लोकांच्या आवडीत बदल होऊ लागला. राजेश काहीसे का होईना मागे पडू लागले. अवतार, अगर तुम न होते सारखे सिनेमे अधून मधून यशाचा स्वाद देत पर, वो बात नहीं रही! ते स्वतः म्हणत, “मैं नीचे गिर गया और चोट इसलिए भी ज्यादा लगी क्योंकी मैं एव्हरेस्टसे गिरा.’
एकशे सत्तर सिनेमाची शिदोरी असलेले राजेश खन्नांनी राजीव गांधी यांच्या सल्ल्याने राजकारणात उडी घेतली. लालकृष्ण आडवाणी विरुद्धच्या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला. पुढे शत्रुघ्न सिन्हाला हरवून ते खासदार झाले. नव्वद नंतर राजेश चरित्र किंवा मध्यवर्ती भूमिका स्वीकारू लागले. टीव्ही सीरियलमध्ये त्यांचे दर्शन होत होते. उतरती कळा होती. जवळची लोक अंतर करू लागली. एक वेळ अशी आली की त्यांच्या बंगल्यावर आयकराची टाच आली. त्याकाळी त्यांना ऑफिसवर राहणे भाग पडले. पडते काळ आणि स्वभावातील रुक्षपणा, कुटुंबीयही दुरावले. पडत्या काळात काही सुमार सिनेमातही त्यांनी कामं केली.
कानात घोळवणारा मधाळ आवाज “बाबू मोशाय… जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नही’, किंवा पुष्पा आय हेट टिअर्स, कौन है वो माई का लाल जिसने सोमू पर हाथ उठाया अशा अनेक चिरतरुण संवादाने रसिकांच्या हृदयात स्थान मिळविणारे राजेश खन्ना हे जग सोडून गेले ते मागे असंख्य आठवणी सोडून. त्यात एक आठवण हीसुद्धा की हा सुपरस्टार दोन वर्षे पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये शिकायला होता.
– सत्येंद्र राठी