सोळाव्या शतकात नोस्त्राडेमसनी विध्वंस होईल असं भाकीत करून ठेवलंय. अंतराळातून उल्का येते का बघत ती नष्ट करायला मिसाइलही तयार ठेवलेत आपण, पण “दिव्याखाली अंधार’ या उक्तीप्रमाणे पृथ्वीवर आपल्याच घरात आपण प्रलयाला पूरक वातावरण निर्मिती कधीपासूनच करतोय त्याचं काय?
निव्वळ स्वार्थी हेतूने निसर्गाला ओरबाडत चाललेली जंगलतोड, वळवलेले नद्यांचे प्रवाह, बांधकामासाठी बंद केलेले नाले, हटवलेला समुद्र आणि असेच खंडीभर आघात! आपल्यातल्या सर्वांनीच गाडी नक्कीच चालवली आहे. दोन चाकी, चार चाकी. कित्येकांनी तर तीन-चार गाड्या बदलल्याही असतील. पण जगात असे करोडोंनी लोकं आहेत ज्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात एकही झाड लावलेलं नाही.
आपली मजल गॅलरीत मनी प्लांट लावण्यापर्यंतच. मनी तर वाढत चाललाय पण खरं प्लांट कुठे आहे? आपल्या मुलांना वृक्ष म्हणजे काय दाखवायला ऍमेझॉनच्या कमी होत चाललेल्या जंगलात नेणार का आपण?
पूर्वी पुण्यातल्या अनेक रस्त्यांवर मोठ-मोठे वृक्ष दिमाखात उभे होते. आता प्रगती झाल्यामुळे त्यांची जागा बॅनरने बळकवली आहे. जे काही तुरळक वृक्ष आहेत त्यांच्या फांद्या आता अतिवृद्ध झाल्याने आणि मुळांना सिमेंटनी आवळल्याने उन्मळून पडू लागले आहेत. बिल्डिंग कम्प्लिशन साठीच्या पाच वृक्ष जमातीच्या झाडांच्या कुंड्या त्याच त्या इकडून तिकडे वेगवेगळ्या साइटवर फिरताना दिसतील. पण अशोकाची आणि शोभेची सोडून कोणी खरे वृक्ष लावतील का दारात? शेवटची चिमण्यांची चिव चिव कधी ऐकल्ये सांगता येईल का? कबुतरांची नेट लावण्यातच आपले श्रम वाया चाललेत.
42 वर्षातला विक्रमी पाऊस दिल्लीत कोसळतोय, जोशी मठ परिसरात भेगा पडल्या, शिमला हायवे वाहून नेला बियास नदीने. या कितीतरी बातम्या आपल्याला जागं करू पाहत आहेत. त्या नुसत्या चहा पिताना वाचून घडी करून ठेवून द्यायच्या, की त्यांच्यावर कायमचे उपाय सुरू करायचे वा चालू असतील त्यांना आपलाही हातभार लावायचा हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. आत्ता नाही तर कधी?
दहावीला कला गुणांचे जसे पाच अतिरिक्त मार्क मिळतात तसेच जर लहानपणापासून संवर्धन केलेल्या वृक्षासाठी मार्क दिले तर त्या लालसेपोटी तरी मुलं नक्कीच झाडं जगवतील. सिमेंटच्या धुळीखाली दडलेलं झाडांचं आक्रंदन जेव्हा जास्तीत जास्त कानांपर्यंत आणि तिथून हृदयापर्यंत पोहोचेल तेव्हा पुढच्या दहा ते वीस वर्षात नक्कीच रुळावरून घसरलेली ही निसर्गाची गाडी सुरळीत चालू लागेल खऱ्या प्रगतीच्या दिशेने!
– मोनाली हर्षे