मुंबई – राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर अखेर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन खाते, छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्रालय, तर दिलीप वळसे-पाटील यांना सहकार खाते देण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी मंत्रालय देण्यात आले आहे. तर हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, खाते वाटपाच्या या जबाबदारी नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांवर बोचरी टीका केली आहे. अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्वीट करून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
चला, अखेर मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर १३ दिवसांनी खाते वाटप झालं…
पहिले २०, नंतर ९ असा विस्तार झाला. आता ह्या सगळ्यानंतर ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का?
ना खाती, ना इज्जत!त्यांची खरी किंमत काय आहे हे त्यांना गद्दारी करायला लावणाऱ्या मिंधे-भाजपा ने ३३ देशांना…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 15, 2023
आदित्य ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, “चला, अखेर मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर 13 दिवसांनी खाते वाटप झालं… पहिले 20, नंतर 9 असा विस्तार झाला. आता ह्या सगळ्यानंतर ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का? ना खाती, ना इज्जत.! त्यांची खरी किंमत काय आहे हे त्यांना गद्दारी करायला लावणाऱ्या मिंधे-भाजपा ने 33 देशांना दाखवून दिलंय..अभिनंदन.!” या आशयाची पोस्ट आदित्य ठाकरे यांनी केली आहे.