इम्फाळ (मणिपूर)- मणिपूरच्या 31 आमदारांच्या गटाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी निर्णायक पावले उचलण्याचे आवाहन एका निवेदनाद्वारे केले आहे. आमदारांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना 9व्या आसाम रायफल्स, 22व्या आसाम रायफल्स आणि 37व्या आसाम रायफल्सच्या सुरक्षा तुकड्यांच्या जागी इतर केंद्रीय सुरक्षा दलांच्या तुकड्या तैनात कराव्यात अशी प्रमुख मागणी केली आहे.या आमदारांनी म्हटले आहे की आसाम रायफल्सच्या काही तुकड्यांनी बजावलेल्या भूमिकांबाबत चिंता आहे, ज्यामुळे सध्या राज्यातील एकतेला धोका निर्माण झाला आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, 5 जुलै 2023 रोजी चुरचंदपूर येथे आयोजित शांतता मार्चदरम्यान बंदुक आणि दारूगोळ्याचे मोठ्या प्रमाणात प्रदर्शन करण्यात आले, त्या घटनेची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. या शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यांच्या स्त्रोताबाबत तसेच हा इतका मोठा शस्त्रसाठा हिंसाचार माजवणाऱ्यांना कसा उपलब्ध झाला याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील सशस्त्र बंडखोरांच्या विरोधात अत्यंत कठोर उपाययोजना केली जावी अशी मागणीही यात करण्यात आली आहे.