डॉमिनिका :- रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आजपासून (Time 7.30 PM) यजमान वेस्ट इंडिजशी पहिली कसोटी खेळणार आहे. विश्वकरंडक पात्रता गमावलेला वेस्ट इंडिजचा संघ एकीकडे तर जागतिक कसोटी अजिंक्यपद गमावलला भारतीय संघ दुसरीकडे अस चित्र दिसत असले तरीही यजमान संघातील खेळाडू यांच्यात तुलना केल्यावर भारतीय संघाचेच पारड जड राहणार आहे.
भारतीय फलंदाजीचा विचार केला तर आठव्या क्रमांकापर्यंत ही फलंदाजी खोलवर आहे. मात्र, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांची मागील काही स्पर्धांतील कामगिरी पाहता त्यांच्यापेक्षा जास्त मदार नवोदितांसह उपकर्णधार अजिंक्य रहाणेवरच राहणार आहे.
गोलंदाजीबाबतही तीच परिस्थिती आहे. महंमद सिराज हाच केवळ परित्यातही शार्दुल ठाकूर अनुभवी आहे परंतु जयदेव उनाडकट, मुकश कुमार, नवदीप सैनी यांच्याबाबत रोहित शर्माला खूप विचार करुन निर्णय घ्यावा लागणार आहे. फिरकी गोलंदाजी रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा व अक्सर पटेल यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची किंवा तिघांनाही खेळवावे याबाबत सामन्याच्या दिवशी सकाळी खेळपट्टी पाहिल्यावरच निर्णय घेतला जाईल.
दुसरीकडे यजमान वेस्ट इंडिजबाबत बोलायचे झाले तर केमार रोश, शेऩ गॅब्रियल, अल्झारी जोसेफ व जेसन होल्डर हे त्यांचे प्रमुख वेगवान गोलंदाज आहेत. त्यातही रोश जास्त धोकादायक आहे. त्याच्यासमोर रोहित, कोहली आणि कंपनी कशी कामगिरी करते हे पाहणे जास्त महत्त्वाचे राहील. मात्र, भारतीय संघाला सलामी कशी मिळते यावरच या सामन्यात भारतीय संघाचे वर्चस्व राहणार का, ते ठरणार आहे.
वेस्ट इंडिजच्या फलंदाजीची प्रमुख मदार कर्णधार क्रेग बर्थव्हाइट, जेरेमी ब्लॅकवूड, नवोदित अलेक अथांजे व तेगनरेन चंदरपॉल यांच्यावरच राहणार आहे. जेसन होल्डर व रहिकीम कॉर्नवॉल हे त्यांचे अष्टपैलू असून त्यांनाही कमी लेखून चालणार नाही. भारतीय गोलंदाज त्यांची फलंदाजी कमी धावांत रोखण्यात यशस्वी ठरले तर सामन्यात भारताचेच पारडे जड राहणार आहे.
जयस्वालवर लक्ष…
भारताचा अवघ्या 21 वर्षांचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल यांच्या कामगिरीकडे लक्ष राहणार आहे. जयस्वालने यंदाच्या देशांतर्गत स्पर्धांमध्येच नव्हे तर आयपीएल स्पर्धेतही सातत्याने भक्कम कामगिरी केली आहे. मात्र, कसोटी क्रिकटमध्ये तो कसा खेळतो, त्याचे तंत्र किती भक्कम आहे तसेच तो मोठी खेळी करण्याच्या क्षमतेचा आहे का हे सर्व काही या पहिल्याच कसोटीतून स्पष्ट होणार आहे. मात्र, संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर दाखवलेला विश्वास त्याला सार्थ करण्यासाठी विंडीजमधील खेळपट्टीचा गांभीर्याने अभ्यास करावा लागणार आहे.
डॅमेज कंट्रोलची जबाबदारी रहाणेवरच…
भारताच्या कसोटी संघात तब्बल दीड वर्षांनंतर परतलेला तंत्रशुद्ध फलंदाज अजिंक्य रहाणे याच्या कामगिरीवर भारताची मदार राहणार आहे. जी भूमिका तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा वठवत होता तेच काम आता रहाणेला करावे लागणार आहे. रोहित, कोहली, गिल यांची सुरुवात चांगली होते मात्र, कोहलीचा अपवाद वगळता बाकी सगळ स्थिरावलेले असताना बाद होताना दिसले आहे.
संघाच्या सराव सत्रात सर्व खेळाडूंनी अनेकदा चर्चा केली. फलंदाजी, गोलंदाजी याबाबत कोणाला काही प्रश्न पडले असतील तर त्यावर कोणता उपाय काढायचा याचाही विचार झाला. हा दौरा संघातील अनेक खेळाडूंसाठी आगामी काळातील स्पर्धांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे व त्यातील कामगिरी पाहूनच त्यांचे संघातील स्थान कायम राहणार आहे.
– रोहित शर्मा (भारतीय संघाचा कर्णधार)
गिलकडून खूप अपेक्षा असल्या तरीही तो अनुभवाने अद्याप कमी आहे. त्यामुळे रहाणेवर खूप मोठी जबाबदारी राहणार आहे. पूर्वी राहुल द्रविड व त्यानंतर पुजारा जे काम करत होते तेच म्हणजे डॅमेज कंट्रोलचे काम आता रहाणेला करावे लागणार आहे.