– कांचन जोशी
पाऊस आला नाही तरी अडचण, आला तरी अडचण अशी अवस्था शहरांची झाली आहे. पाऊस पडल्यानंतर मागच्याच वर्षीची समस्यांची मालिका पुन्हा सुरू होते. पण यावर काहीही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत.
उत्तर भारतातील अनेक राज्यांत गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाळा येणे आणि त्यासोबत संकटांची मालिका येणे हा शिरस्ताच झाला आहे. शहरांची नावे तेवढी बदलतात किंवा काही शहरांची नावे कायम राहतात. मात्र, अडचणी आणि शहराचे भर पावसात उघडे पडणे हे दरवर्षी नित्यक्रमाने सुरू आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई असो किंवा राजकीय राजधानी दिल्ली असो इथून तिथून सगळीकडे अंधारच आहे. पावसामुळे दिल्लीकडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली.
दिल्ली-हावडा मार्गावर पाणी भरले गेले. त्यामुळे रेल्वे अलीकडेच म्हणजे दादरा स्थानकावर थांबवावी लागली. पोलिसांनी लाउड स्पीकरवर घोषणा करून प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. ही ट्रेन अर्थात जम्मूतावी एक्स्प्रेस आता पुढे जाणार नाही. सगळ्यांनी खाली उतरावे असे जाहीर करण्यात आले. बस, ओला आणि तत्सम वाहनांतून प्रवाशांना दिल्लीकडे रवाना करण्यात आले. अधिक पाऊस झाल्यावर किंवा अभूतपूर्व असा पाऊस झाल्यावर अशा प्रकारची स्थिती उद्भवणे समजले जाऊ शकते. तथापि, सर्वसामान्य पावसात तोही अगदी सुरुवातीच्या टप्प्यातील पाऊस असताना जर देशाच्या राजधानीत ही परिस्थिती ओढवत असेल तर आपले नक्की कुठेतरी चुकते आहे, हे स्पष्ट आहे. ज्या चुका आता दुरूस्त करता येणार नाहीत त्यांचे एकवेळ सोडू. पण जी घाण आपण करून ठेवली आहे ती निस्तरण्याचा प्रयत्न आता होणार आहे का?
पावसाळा हा खरेतर आनंद देणारा ऋतू. उष्णतेने हैराण झालेल्या लोकांना काहीसा गारवा देणारा, दिलासा देणारा. कवींच्या प्रतिभेला नवी पालवी देणारा. अनेक कलावंतांना प्रेरणा देणारा. पावसाचे आगमन झाल्यावर किंवा त्याची नुसती चाहुल जरी लागली तरी मनाला प्रसन्नता येते. पण गेल्या दशकभरात याचे तंत्रच बिघडले आहे. पावसाची चाहुल लागली तरी हादरायला होते आहे. एकीकडे अन्नसुरक्षेसाठी पाऊस वेळेवर पडणे, नियमित पडणे आणि प्रमाणात पडणे आवश्यक. ते आता होत नाहीये. पावसाचे लहरीपण आता मुळावर उठल्यासारखे जाचक ठरू लागले आहे. त्याचे वेळापत्रक बदलले आहे तसेच त्याचा स्वभावही. त्याचे सातत्य पूर्वीसारखे राहिलेले नाही. तो अत्यंत बेभरवशाचा झाला आहे. अर्थात या सगळ्याची कारणे आहेत. पण तो वेगळा विषय आहे. आताचा गंभीर मुद्दा असा आहे की अत्यंत किमान पावसात लोकांना त्याचा उपद्रव असह्य का होतो, हा आहे.
पाऊस आला की लगेचच रस्ते जलमय होतात. बरे त्या पाण्याचा निचरा होतच नाही आणि अनेक तास ते तेथेच ठाण मांडून बसलेले असते. या पाणी आडवा आणि पाणी तुंबवाच्या कामात रस्त्यांवरील खड्ड्यांची पावसाला साथ मिळते. त्यातून लोकांचा इंच इंच लढवत प्रवास सुरू असतो. आपले सगळे कौशल्य पणाला लावून चालक त्यांची वाहने हाकत असतात. त्यात कोंडीची भर पडत असते आणि त्याला कोरस म्हणून कर्णकर्कश हॉर्नची साथ मिळते. दिल्लीत आज हेच चित्र आहे. हे मुंबईत दरवर्षी असते आणि गेल्या तीन-चार वर्षांपासून पुण्यातही हाच प्रकार सुरू झाला आहे. ही नावे केवळ वानगीदाखल. प्रगती करू पाहणाऱ्या देशातल्या आणि प्रत्येक राज्यातल्या लहान मोठ्या शहरांत हीच स्थिती आहे.
समस्या केवळ वाहतुकीची आणि कोंडीची नाही तर त्यातून होणाऱ्या अपघातांचीही आहे. वाहनांसकट चालक वाहून गेल्याच्या घटना पुण्यात आणि अन्यत्रही घडल्या आहेत. मॅनहोलमध्ये पडून प्राण गमावण्याच्या घटनाही घडल्या आहेत. असले प्रकार जेव्हा घडतात किंवा पाहायला मिळतात तेव्हा आनंद देणारा पावसाळा संकट देणारा शत्रूच वाटायला लागतो. देशाचे मानबिंदू असलेल्या राजधान्यांमध्ये पावसाच्या काळात जर इतकी गंभीर आणि भीषण अवस्था असेल तर इतर ठिकाणांची कल्पनाच केलेली बरी. रस्ते तुंबणे, रेल्वेमार्ग बंद होणे याचा सामना पहिल्याच पावसात करावा लागत असेल तर भविष्यातील गंभीर संकट दारात येऊन ठेपले आहे. उन्हाळा संपत आल्यावर साधारणत: पावसाळापूर्व कामांच्या चर्चा सुरू होतात. आपली सज्जता असल्याचे जाहीर केले जाते.
नालेसफाई वगैरेची माहिती साग्रसंगीत ऐकवली जाते. हे सगळे जर इतके नेटकेपणाने होते असा दावा केला जातो तर मग प्रत्यक्षात पहिल्याच पावसात चेहऱ्यावरचा रंग कसा उडतो हा प्रश्न आहे. काही शहरे आणि तेथील महाभाग प्रशासकीय यंत्रणा तर कहरच करत आहेत. पावसाळापूर्व कामे आता पावसाळ्यात केली जात असल्याच्या बातम्या आहेत. महाराष्ट्रात यंदा पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे अजून म्हणावा तसा किंवा पाऊसच झालेला नाही. तरी पुण्यासारख्या महानगरातील रस्त्यांचा कानोसा घेतला तर आपल्याला पुढचे तीन महिने कशाचा सामना करावा लागणार आहे, याची धास्ती वाटू लागते.
यशाकडे नेणाऱ्या मार्गाचे काम कायमच सुरू असते अशा आशयाची एक म्हण किंवा सुविचार इंग्रजीत आहे. भारतातील सगळीच विशेषत: पुण्यासारखी शहरे यशाच्या मार्गावरून वाटचाल करताना दिसतात. कारण, येथे प्रत्येक ठिकाणी मार्गांच्या डागडुजीचे काम सुरूच असते. खोदाई आणि पोताई नियमितपणे निर्धाराने चालते. गेल्या काही काळात छोट्या शहरांसोबतच ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास होतो आहे हे नाकारता येणार नाही. मात्र जेथे हा विकास झाला आहे तो टिकाऊ आहे की कामचलावू होता याचा आढावा घेण्याचीही गरज आहे. शहरांच्या विकासकामांत सहभागी असणाऱ्या अभियंते, अधिकारी, तज्ज्ञांना आणि एकूणच प्रशासनाला ते करत असलेल्या कामाच्या मर्यादा आणि भविष्यात होणाऱ्या अडचणींची चांगली कल्पना असते. तरीही अशी कामचलावू कामे का केली जातात, या पाणी “मुरण्याच्या’ प्रकारामुळे पाण्याचा निचरा न होता पाणी साचण्याचेच प्रकार होतात.
हल्ली हौसेने आणि अट्टहासाने पूल बांधण्याचे आणि कथित नियोजन चुकल्यामुळे पुन्हा तो पाडण्याचे फॅड आले आहे. जोपर्यंत आपल्याकडे विकासाबाबतच्या या दूरदृष्टीचा अभाव असेल तोपर्यंत आपण समस्यांच्या दुष्टचक्रातून बाहेर पडू शकणार नाही आणि नागरिकांचे जीवनही सुसह्य होणार नाही. ज्या कामाची ज्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यांना त्याकरता उत्तरदायी केले जात नाही तोपर्यंत त्यांच्यातील दूरदृष्टी विकसित होणार नाही. त्यांना त्यांची “क्रिएटीव्हीटी’ दाखवण्याची संधी मिळणार नाही. अभ्यास न करताच सगळे उरकण्याची त्यांची सवय मोडणार नाही. प्रत्येक बाबीचे काही नियम, निकष आणि निष्कर्ष असतात. ते सरसकट दुर्लक्षित करायचे आणि कोणाच्या तरी हानी-लाभासाठी काहीतरी बांधणी करायची आणि सगळ्या शहराला जेरीस आणायचे, हा प्रकार थांबायला हवा.