मुंबई – बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसी 2003 साली प्रदर्शित झालेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटामुळे लोकप्रिय झाला. या चित्रपटातील ‘सर्किट’ या भूमिकेमुळे त्याला विशेष पसंती मिळाली. त्यानंतर 2006 साली ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटाला ही मोठे यश मिळाले. त्यानंतर अनेकजण आता मुन्नाभाई चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच आता अर्शदने केलेल्या विधानामुळे अनेकांना धक्का बसला आहे. ‘मुन्नाभाई 3’ कदाचित होणार नाही, असे अर्शदने म्हटले आहे.
एका मुलाखतीत अर्शद म्हणाला की, “आमच्याकडे हा चित्रपट बनवणारे दिग्दर्शक आहेत. याशिवाय प्रोड्युसरही आहे जे या चित्रपटाचे निर्माता आहेत. प्रेक्षकही आहेत, जे हा चित्रपट पाहू इच्छितात. अभिनेते आहेत, जे यात अभिनय करू इच्छितात. पण, तरीही चित्रपटाचं काम होत नाही. राजू हिराणी हे परफेक्शनिस्ट आहेत. त्यांच्याकडे तीन स्क्रीप्ट आहेत, ज्या खूप चांगल्या आहेत. पण, काहीतरी गडबड आहे. म्हणूनच, जोपर्यंत 100 टक्के खात्री होणार नाही, तोपर्यंत राजू हिराणी तो चित्रपट सुरु करणार नाही.”
याशिवाय याआधी एका मुलाखतीत अर्शदने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटानंतर त्याचे करिअर संपेल, अशी तेव्हा भीती वाटली होती, असेही सांगितले होते. ‘हा चित्रपट माझा करिअरमधील शेवटचा चित्रपट असेल, असे मला वाटले होते. या भूमिकेला मकरंद देशपांडेसारख्या कलाकारानेही नकार दिला होता, अशी ही एका गुंडाची भूमिका होती. त्यामुळे हा चित्रपट केल्यानंतर माझं आयुष्य बरबाद होणार आहे हे मला माहित होते,’ असे त्याने म्हंटले होते.
दरम्यान, अर्शदची सध्या ‘असुर 2’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. पहिल्या भागाप्रमाणे या सिरिजच्या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यातील त्याच्या भूमिकेचेही कौतुक केले जात आहे.