सोलापूर – आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावे यासाठी परंपरेनुसार श्री विठ्ठलाचे दर्शन 24 तास सुरू करण्यात आले आहे. यासाठी देवाचे नित्याचे राजोपचार बंद करण्यात आले आहेत. देवाला एक वेळ महानैवेद्य आणि केवळ लिंबूपाणी दिले जात आहे. दरम्यान, पालखी सोहळे अद्याप सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर आहेत तरीही पंढरीत भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. मंगळवारी देवाच्या दर्शनासाठी 12 तासांहून अधिकचा अवधी लागतो आहे.
आषाढी यात्रेसाठी 12 ते 15 लाख भाविक पंढरीत येत असतात आणि त्या सर्व भाविकांना विठ्ठल दर्शन मिळावे यासाठी आषाढ शुद्ध प्रथमा या दिवसापासून ते पौर्णिमेपर्यंत विठ्ठल दर्शन 24 तास सुरू ठेवण्यात येते. यादरम्यान श्री विठ्ठलाचे नित्योपचार थांबवले जातात. मंगळवार, 20 जून रोजी सकाळी 11 वाजता विठ्ठलाचा पलंग काढण्यात आला. मंगळवारपासून पुढील 15 दिवस देव भाविकांना दर्शन देण्यासाठी अविश्रांत उभा राहणार आहे. त्यामुळे शिणवटा कमी व्हावा म्हणून विठ्ठल आणि रुक्मिणी दोन्ही देवतांच्या मूर्तीच्या पाठीशी लोड देण्यात आला आहे.
दर्शनासाठी 12 तासांचा अवधी
दर्शनासाठी पंढरीत येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. मंगळवारी दर्शन रांग पत्रा शेडमधील 3 क्रमांकाच्या शेडमध्ये पोहोचली आहे. दर्शनरांगेत 70 हजारांहून अधिक भाविक आहेत. त्यामुळे सध्या दर्शनासाठी सुमारे 12 तासांचा अवधी लागतो आहे.