मुंबई :- 105 जणांचे नेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे शिंदे गटाच्या 40 जणांनी मातेरे केले आहे. त्यामुळे त्यांचे कानदुखीचे कारण खरे असू शकेल. या जाहिरातीमुळे फडणवीसांचे कानच काय, पोट, छातीतही दुखू शकते, असा खोचक टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.
“देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, या शिंदे गटाच्या जाहिरातीमुळे फडणवीस कमालीचे नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच कानदुखीचे कारण देत त्यांनी मंगळवारी शिंदे यांच्यासोबत कोल्हापूरला जाणे टाळले, अशीही चर्चा आहे.
राऊत यावेळी पुढे म्हणाले, जाहिरात आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा कान दुखत आहे. त्यांना कानदुखीचे कारण खरे आहे. जे वार सध्या महाराष्ट्रात चालू आहे, ते वार जर कोणाच्या कानात शिरले, तर कोणाचाही कान दुखू शकतो. त्यामुळे फडणवीसांची प्रकृती समजून घेतली पाहीजे. शिंदे सरकारला हार्ट अटॅकही येऊ शकतो.
मंगळवारच्या जाहिरातीमुळे एकनाथ शिंदेंच्या मनात काय आहे, हे स्पष्ट झाले. काल फडणवीसांनी खडसावल्यामुळेच आज नवीन चित्र दिसले. मात्र, प्रत्यक्षात शिंदे गट व भाजपात सर्व आलबेल नाही, हे स्पष्ट झाले आहे. येत्या एक, दोन महिन्यात हे सरकार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल.
जो बूंद से गई….
दरम्यान, काल जाहिरातीवरून वादंग निर्माण झाल्याने आज शिंदे गटाने पुन्हा सुधारित जाहिरात दिली आहे. त्यात देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब ठाकरे यांन स्थान देण्यात आले आहे. त्यावर राऊत म्हणाले, फडणवीसांच्या नाराजीमुळेच नवीन जाहिरात देण्यात आली आहे. पडद्यामागे काय घडले हे मला माहिती आहे. मात्र, “जो बूंद से गई, वो हौद से नही आती.’ तसेच मुख्यमंत्री शिंदे नुकतेच जम्मू-काश्मिरला जाऊन आले. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, तेथे त्यांना भेटायला कोण-कोण आले, याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. भविष्यात एक मोठा गौप्यस्फोट करेल, असा इशाराही राऊतांनी केला.