कोलकता :- पंचायत निवडणुकांमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. ग्रामीण भागासाठी त्या निवडणुका अतिशय महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष ताकदीने रिंगणात उतरतील. तसे असले तरी बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसपुढे विरोधक फारसा तग धरू शकणार नाहीत.
तृणमूलचा प्रमुख प्रतिस्पर्धी ठरण्यासाठी खरी चुरस विरोधकांमध्येच असेल, असेच अंदाज वर्तवले जात आहेत. ते खरे ठरल्यास कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांची हातमिळवणी भाजपसाठी मोठे आव्हान ठरू शकते.
बंगालमध्ये तृणमूलला पर्याय ठरण्यासाठी भाजपने अतिशय शर्थीचे प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यश आले नाही. मात्र, डावे पक्ष आणि कॉंग्रेसला मागे टाकून त्या राज्यात प्रमुख विरोधी पक्ष बनण्याचा मान भाजपने मिळवला.
तृणमूल आणि भाजपच्या राजकीय दंगलीत डावे पक्ष, कॉंग्रेस क्षीण बनल्याचे काही काळ दिसून आले. पण, आता राजकीय अपरिहार्यता विचारात घेऊन पंचायत निवडणुकांसाठी डावे पक्ष आणि कॉंग्रेस एकत्र आले आहेत. त्यामुळे ते अगदी तृणमूलला नाही; तर किमान भाजपला टक्कर देऊ शकतील, असे मानले जात आहे. पंचायती राज संस्थांच्या कार्यक्षेत्रात बंगालमधील 65 टक्के जनता राहते. ती बाब पंचायत निवडणुकांचे महत्व अधोरेखित करण्यास पुरेशी आहे.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी आता वर्षभराचा कालावधीही शिल्लक नाही. बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी होणाऱ्या पंचायत निवडणुकांचा उपयोग राजकीय पक्ष स्वत:साठी ग्राऊंड बनवण्यासाठी करू शकतील.