पुणे : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला गालबोट लागणारा प्रकार समोर आला आहे. रविवारी दुपारी चारच्या सुमारास पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन झटापट झाली. यामध्ये पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे किरकोळ झटापट झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, आता या सर्वात एका वारकऱ्याचा व्हिडीओ समोर येत असून यात पोलिसांनी एकांतात नेवून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडोओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वारकऱ्यांसोबत आमची केवळ झटपट झाल्याचे पोलिसांनी म्हटले होते. मात्र पोलिसांचा हाच दावा एका तरुण वारकऱ्याने खोडून काढला आहे. विशाल पाटील असे या वारकऱ्याचे नाव आहे. त्याने पोलिसांच्या झटापटीचा दावा खोडत आपल्या अंगावर झालेल्या जखमा दाखवल्या तसंच आम्हा चार वारकऱ्यांना पोलिसांनी बाजूच्या एका घरात नेऊन मारहाण केल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला आहे.
विशाल पाटील यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करताना, ‘मी जोग महाराज संस्थेचा विद्यार्थी आहे. जळगाव येथील राहणारा आहे. आम्ही पालखीला दरववर्षी येतो. आम्हाला प्रस्थान सोहळ्याला दरवर्षी सोडतात. मात्र पोलिसांचं अचानक ठरलं की, आम्हाला आत सोडायचं नाही. आम्हा चार वारकऱ्यांना २० पोलिसांनी मारहाण केली. आमच्यावर हात उचलला. भविष्यात इतर वारकऱ्यांवरही ते हात उचलू शकतात. पोलिसांनी आम्हाला मारहाण का? केली या प्रश्नाचे उत्तर त्यांनी द्यावं,’ अशा शब्दांत या तरुण वारकऱ्याने आपला संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, वारकऱ्यांना झालेल्या लाठीचार्जवरून आता राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे या प्रकरणावरून आता राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षाकडून ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.