नगर – नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे वन विभागाचे साडे आठशे हेक्टर वनक्षेत्र असून, गावातील वृक्षांची बेसुमार कत्तल केली जात आहे वन विभागाचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या बांधावरील शेतातील झाडे तोडण्यासाठी लाकूडतोड्यांची यंत्रणा सक्रिय झाली आहे. शेतकऱ्यांकडून कमी किमतीत झाडे विकत घेऊन त्याची तोड केली जात आहे. विशेषत: ही झाडे तोडण्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना असूनही संबंधित कर्मचारी याकडे पाठ फिरवत आहेत कारवाई करण्याऐवजी कर्मचारी वृक्षतोड करणाऱ्यांना अभय देत आहेत त्यामुळे शासकीय यंत्रणेचा कसलाही अंकुश वृक्ष तोड करणाऱ्यांवर राहिलेला नाही.
या बाबत भाऊसाहेब शिंदे यांनी थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दूरध्वनी करून गुंडेगावातील वृक्ष तोड संदर्भ तक्रार नंतर वनविभाग अधिकारी ऍक्शनमोडवर येऊन वनविभागाचे अनेक अधिकारी गुंडेगावात दाखल झाले.तसेच अधिकारी यांनी वनविभागातील झाडांची पाहणी केली. वृक्ष तोड केल्यास कठोर कारवाई करण्यात येइल, असे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.
नगर तालुक्यात अनेक ठिकाणी वृक्षांची तोडणी सुरू आहे. वृक्षतोड जर अशीच होत राहिली तर आगामी काळात वने नष्ट होऊन प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येईल, त्यामुळे वनविभागाचे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. झाडे लावा झाडे जगवा या योजनेतून अनेक झाडे लावली जात असून एकीकडे होत असलेली वृक्षतोड मोठी समस्या बनली आहे, म्हणून वृक्षतोडीवर लवकर आळा बसणे गरजेचे आहे, असे गुंडेगावचे ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी म्हणाले.