पाचगणी (प्रतिनिधी)- “माझी वसुंधरा अभियानांतर्गत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्पर्धेत 15 हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांचा गटामध्ये महाबळेश्वर नगरपालिकेचा सन्मान मुंबई येथे करण्यात आला. महाबळेश्वरच्या प्रशासक पल्लवी पाटील यांच्या कामगिरीमुळे महाबळेश्वर नगरपालिकेला राज्यस्तरीय तिसरा क्रमांक मिळवत दीड कोटी रुपयांचे बक्षीस हा सन्मान मिळाला.
या अभियानांतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, सरंक्षण, जतन करण्याकरीता महाबळेश्नर नगरपालिकेने मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कामगिरीची दखल घेण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार पल्लवी पाटील यांना प्रदान करण्यात आला. यावेळी नगरपालिकेचे कर्मचारी आबा ढोकळे, सचिन दीक्षित, स्वच्छता मुकादम मनोज चव्हाण, अभियंता रोहित अतवाडकर उपस्थित होते.
महाबळेश्वर नगरपालिकेला मिळलेला पुरस्कार महाबळेश्वरच्या सर्वसामान्य नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळे तसेच सजग पर्यावरणवादी नागरिकांच्या सहकार्यामुळे पुरस्कार मिळवणे शक्य झाले असल्याची भावना पल्लवी पाटील यांनी व्यक्त केली.