स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे 1918 साली जन्मलेल्या सुशीलाबाई बवरे यांचं “मोरपिसे आठवणींची’ हे आत्मचरित्र अनेक कारणांनी लक्षात रहाण्यासारखं आहे. त्यांचा विवाह 1936 साली म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षी झाला. ज्या काळात जरठकुमारी विवाह होत असत, बालविवाह होत असत त्या काळात त्यांचा परिचयोत्तर विवाह झाला व मनासारखा जोडीदार मिळाला. त्यांच्या कुटुंबात मुली जास्त पण त्यांच्या वडिलांनी कधी राग राग केला नाही. त्यांच्या पतीचा स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग होता. सामाजिक कार्यात सहभाग होता.
आपल्या कार्यात त्यांनी पत्नीचाही सहभाग घेतला, समाजकार्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या सासऱ्यांचे 1947 मध्ये निधन झाले; पण त्यांच्या पतीने आईचे केशवपन करू दिले नाही. घटस्फोटित बहिणीचा पुनर्विवाह लावून दिला. सुशीलाबाई त्या काळात नाटकात काम करत होत्या. नाटकाच्या तालमीसाठी त्या रात्रभर जायच्या परंतु त्यांच्या सासरच्या एकाही व्यक्तीने त्यांना विरोध केला नाही.
यमुना भाटे यांचे “माझी जीवनकहाणी’ हे आत्मचरित्र आजच्या काळातही खूप काही शिकवून जाते. त्यांचा जन्म 1915 सालातला. त्या काळात त्यांनी वसतिगृहात राहून शिक्षण घेतले. पतीच्या मृत्यूनंतर त्या 30 वर्षे जगल्या. इतकी वर्षे एकट्याने काढली. या काळात नातवंडांना सांभाळले, मुलीला संसारात मदत केली. हे करून आपलं आयुष्य थोडं सुखकर केलं.
शांताबाई शेळके यांचं जगण्यावर प्रेम करायला शिकवणारे “धूळपाटी’ हे आत्मचरित्र. जगण्यावर प्रेम करणं म्हणजे नेमके काय ते यातून कळतं. जीवन जसं समोर येईल तसं जगावं असा त्यांचा विश्वास असल्याने आयुष्यात पुढे अमुक करू हे ठरवण्यात त्यांना मान्य नव्हते. ग. दि. माडगूळकर यांची पत्नी विद्या माडगूळकर यांचे “आकाशाशी जडले नाते’ हे आत्मचरित्र. त्या स्वतः उत्तम गायिका होत्या. परंतु संसारात पडल्यावर त्यांनी स्वत:ची हौस, छंद बाजूला ठेवून संसाराची जबाबदारी स्वतः घेऊन कही राजांना मुक्त केले. पती, संसार याच्याशी त्या एकरूप झाल्या. आयुष्यात जे समोर येईल ते आनंदाने स्वीकारत राहिल्या.
प्रिया तेंडुलकर यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत असतानाचे अनुभव लिहिले आहेत. आवर्जून लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे वडील आणि मुलगी यांचं हळवं भावूक नातं. आपल्या मुलीला त्रास व्हायला नको म्हणून जपणारे वडील तर आपल्या मुलीने नवे अनुभव घ्यावेत असा विचार करणारे विजय तेंडुलकरांसारखे वडील.
सुशीलाबाई वैद्य यांचं “एका आजीबाईंच्या उचापती’ हे लडिवाळ आत्मचरित्र. अनेक उचापती हव्याहव्याशा वाटणारं. हिंगण्याला वृद्धाश्रमात रहायला आल्यावर तिथल्या वृद्धांना सकारात्मक विचार दिला. मंगेश पाडगावकर यांच्या कवितेतील “सांगा कसं जगायचं कण्हत कण्हत का गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवायचं’ हे प्रत्यक्षात करून दाखवले. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली.
डॉ. लीला दीक्षित यांचे “प्रांजलाचे आरसे’ हे सहवासातल्या व्यक्तींची व्यक्ती चित्रे रेखाटून आपल्या आठवणी मांडणारे आत्मचरित्र. यात त्यांचे पती गणेश दीक्षित यांच्या विषयी केलेले लेखन हे सहजीवन, तडजोड याचा अर्थ सांगणारे आहे.
आपण नेहमीच स्त्रियांच्या आत्मचरित्राविषयी वाचतो. ज्यात पतीमुळे आयुष्यात झालेले बदल मांडलेले असतात. “साथ जन्मांतरीची’ हे मात्र आगळेवेगळे चरित्र आहे. श्रीकृष्ण चौकुळकर यांनी पत्नी पुष्पा चौकुळकर यांचे लिहिलेले “साथ जन्मांतरीची’ हे चरित्र यात चक्क पत्नीने सासरी केलेली तडजोड, तिला झालेला त्रास याविषयी स्पष्ट लिहिले आहे. माधव ज्युलियन यांची पत्नी लीलाताई पटवर्धन यांनी लिहिलेले “आमची अकरा वर्षे’ हे आत्मचरित्र माधव ज्युलियन स्त्री-पुरूष समानता फक्त विचारात नाही तर प्रत्यक्षातही पाळत होते,
त्या काळात कोल्हापूरला थिएटरमध्ये चिकाचे पडदे असायचे आणि बायकांनी पुढे तर पुरुषांनी मागे बसायचे अशी पद्धत होती परंतु माधव ज्युलियन यांनी पत्नीला स्पष्ट सांगितले होते की, आपण एकत्र बसायचं. शशिकला उपाध्ये यांचे “माझं पुस्तक’ हे आत्मचरित्र त्यांची अगदी कॉलेज जीवनापासून शब्द मैत्री प्रेम दाखवतात. या शब्द मैत्रीचे त्यांनी व्यवसायात केलेले रूपांतर तेही अगदी यशस्वी पणे हे दाखवतात. शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचे “माज्या जल्माची चित्तरकथा’ हे आत्मचरित्र त्यांनी आपल्या अस्तित्वासाठी केलेली लढाई दिसते. किती यातना सहन केल्या तेही कळते. त्याचं हे आत्मचरित्र पहिलं दलित स्त्रीचं आत्मचरित्र आहे.
“घडता घडविता’ हे कार्यकर्त्या स्त्रियांच्या कार्याची आणि अनुषंगाने कौटुंबिक आयुष्याची ओळख करून देणारे पुस्तक. उदास वाटत असेल तर पुस्तकाचे कुठलेही पान उघडा आणि वाचायला सुरुवात करा. यातल्या अनेकींचा प्रवास थक्क करणारा आहे.
मथुताई आठल्ये या बालविधवा परंतु इतक्या जुन्या काळात त्यांनी वैधव्यामुळे आलेला न्यूनगंड बाजूस सारून वैद्यकीय शिक्षण घेतले. सरकारी नोकरी धरली तीही फिरतीची. त्या चक्क त्यांच्या सहाय्यक पुरुष सहकाऱ्यांबरोबर रात्री-अपरात्री प्रवास करायच्या. त्यांना सलाम.
समाज कार्यकर्त्या साधना आमटे यांचं बाबांशी असलेलं अद्वैताचं नातं आणि हा समाजसेवेचा वसा चालवणारी तिसरी पिढी, हेही विशेष आहे. नसीमा हुरजूक यांनी आपल्या अपंगत्वावर मात करून आयुष्यात ताठपणे उभ्या राहिल्या आणि इतरांनाही वेगवेगळ्या उपक्रमातून स्वावलंबी बनवले. अशा या प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या इतरांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या इतरांना जगण्याचा आनंद देणाऱ्या, इतरांसाठी आदर्श ठरलेल्या, पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर दोन पावले पुढे चालणाऱ्या साऱ्याजणी.
– नीलम ताटके