मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सोमवारी ईडी कार्यालयात हजर झाले होते. यावेळी ईडीकडून त्यांची तब्बल साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर आणि चौकशीला हजर होण्यापूर्वी राष्ट्रवादी आणि पक्षाच्या इतर नेत्यांनी त्यांना फोन केला होता. परंतु विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जयंत पाटलांना एकही फोन केलेला नव्हता. त्यामुळे पक्षातच मतभेद असल्याचे सांगितले जात होते. दरम्यान, जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, जयंत पाटील हे पूर्णपणे निर्दोष असून ते याप्रकरणातून बाहेर येतील. त्यामुळे मी जरी फोन केला नसला तरी मी जयंत पाटील यांच्यासोबत आहे. तसेच अजित पवारांच्या बाबतीत देखील आहे. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. राष्ट्रवादीच्या कामानिमित्त त्यांच्यासोबत भेट होतच राहते.
महाविकास आघाडीत सर्वच भाऊ आहेत. आता मोठा कोण आणि छोटा कोण? हे कशावरून ठरवायचे. मला या सर्व भावांच्या कार्यकर्त्यांना सांगायचेय की याबाबत तिन्ही भावांचे प्रतिनिधी एकत्रित बसणार आहेत आणि कोण कुठून लढवणार हे सुद्धा ठरणार आहे. यामध्ये कोणाला दोन-तीन चार जास्त तर कुणाला काही जागा कमी मिळतील. महाविकास आघाडी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत दैदीप्यमान असं यश मिळवल्याशिवाय राहणार नाही, असेही भुजबळ म्हणाले.
राष्ट्रपतींच्याच हस्ते उद्घाटन रास्त
जुन्या संसद भवनाचे स्थान अतिशय चांगल्या मनाने मनात कोरले गेले आहे. आता हे नवीन संसद भवन उभारण्यात आले आहे. संसद भवन हे देशातील प्रमुख निर्णय घेणारे भवन आहे. त्यावर भाष्य करण्यासाठी मी काही खासदार नाही. परंतू, देशाचे राष्ट्रपती हे देशातील पहिल्या क्रमांकाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या हातातून उद्घाटन व्हायला पाहिजे. ही भूमिका अतिशय रास्त आहे. कारण राष्ट्रपती हा सर्वांचा असतो. पंतप्रधानांना पक्षाचे लेबल लागते, असेही भुजबळ यावेळी म्हणाले.