राहुरी – राहुरी नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी राहुरी पालिका हद्दीतील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवली. आजच्या या धडक मोहिमेत गटारावरील बांधकामे पाडण्यात आली. टपऱ्या हलवण्यात आल्या. अनेक अतिक्रमणधारकांनी स्वतःहून त्यांच्या हातगाड्या आज रस्त्यावर आणल्या नाहीत. त्यामुळे राहुरीतील मुख्य रस्त्यांनी आज मोकळा श्वास घेतला. मात्र, हे चित्र फक्त आजच्या दिवसापुरतेच राहणार का, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
छोटे व्यापारी, हातगाडीवाले, फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. हॉकर्स झोन विकसित करून त्या ठिकाणी हातगाडीवाल्यांची व्यवस्था केली जावी, अशी अनेक वर्षांपासूनची पालिकेकडे मागणी आहे. मात्र, पालिका या दिशेने काही करत नाही. केवळ अतिक्रमण हटवण्याचा देखावा म्हणून एखाद्या दिवशी तीन-चार महिन्यांतून अशी मोहीम राबवली जाते आणि पुन्हा अतिक्रमणधारक जागेवर येऊन त्यांचे त्यांचे व्यवसाय सुरू करतात.
परिणामी वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे तिथेच राहतो. मात्र, हॉकर्स झोन विकसित करण्याच्या योजनेपासून पालिका अजून कितीतरी दूर आहे. नाही म्हणायला गटारी क्रॉंकिटीकरण आणि परत भूमिगत गटारीकरणासाठी पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र, आरक्षित हॉकर्स झोनसारख्या मूलभूत पायाभूत सुविधा उभाराव्यात असे पालिकेला अद्यापही वाटलेले नाही. पालिका अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा देत नाहीत, तोपर्यंत अतिक्रमणे हटाव मोहीम केवळ देखावा स्वरूपात राहील, असे अनेकांना वाटते. त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्याव्यात, या दिशेने पालिकेने उपाययोजना करावीत, अशी छोट्या व्यावसायिकांची मागणी आहे.
राहुरी नगरपरिषद प्रशासनाने आज पोलिस बंदोबस्त घेऊन शहरातील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारला. अनेक ठिकाणचे गटारावरील अतिक्रमण काढण्यात आले. नामफलक हटवले गेले. त्यामुळे शहरातील वाहतूक मोकळी झाली. काही ठिकाणी व्यापारी व नगरपरिषद प्रशासन यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. अनेक दिवसांपासून राहुरी शहरातील अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढले होते. काही व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या मध्यापर्यंत अतिक्रमण केल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. वाहनधारकांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागत होता.
चार दिवसांपूर्वी राहुरी नगरपरिषद प्रशासनातर्फे प्रसार माध्यमातून शहरातील अतिक्रमण काढून घेण्याबाबत शहरवासीयांना आवाहन केले होते. त्यामुळे काही छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी कारवाई होण्याअगोदरच अतिक्रमण काढून घेतले होते. मात्र, आज सकाळी नगरपरिषद प्रशासनाने पोलिस बंदोबस्त घेऊन अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली. नगरपरिषद कार्यालयासमोरील रस्त्यावरील हातगाड्या काढल्या. नंतर शिवाजी रोड व शिवाजी चौक परिसरातील अतिक्रमणामध्ये असलेले दुकानासमोरील ओटे, पायऱ्या व नावाचे फलक काढण्यात आले.
आडवी पेठेतील छोट्या मोठ्या टपऱ्या काढून घेतल्या. त्यामुळे शहरातील रस्ते आज पूर्णपणे मोकळे होऊन वाहतूक सुरळीत सुरू झाली. या कारवाईत मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, विकास घटकांबळे, महेंद्र तापकीरे, स्वप्नील काकड, सुरेंद्र आंधळे, सुनील कुमावत आदी विभागातील 40 पेक्षाही अधिक कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे व पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता. काही ठिकाणी व्यापारी व नगरपरिषद अधिकाऱ्यांची शाब्दिक चकमक झाली. मात्र, मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त असल्याने अतिक्रमण काढण्यात नगरपरिषद प्रशासनाला यश आले आहे.