राहुरी – नगर-मनमाड रेल्वे मार्गावर राहुरी रेल्वेस्थानक येथील मुळा नदीवर जुन्या सुमारे 100 वर्ष प्राचीन लोखंडी पुलाशेजारी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन पूल उभारला जात आहे. नगर- मनमाड रेल्वेमार्ग विद्युतीकरण केल्यानंतर आता दुहेरीकरण वेगाने पूर्ण होत आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्याच कामाचा भाग असलेला रेल्वेचा दूसरा पूल उभारला जात आहे.
नगर- मनमाड हा रेल्वे मार्ग जिल्ह्यातील महत्वाचा भाग आहे. ग्रामीण भागातील प्रवासी रेल्वेने ये-जा करीत असतात. जुन्या काळी प्रवास करण्यासाठी फक्त रेल्वे, बस, घोडा-गाडी, बैलगाडी अशी वाहनेच उपलब्ध होती. त्यामुळे सातत्याने रेल्वे प्रवास करावा लागत असे. आता प्रवासी वाहतूक व्यवस्था चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे. त्यातच घरोघरी आता दुचाकी व चारचाकी वाहने उभी राहिली आहे. रस्त्यांची अवस्था ही त्या प्रमाणात बरी आहे. रेल्वे विभागाने देखील रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
तसेच नियोजित गाड्यांची संख्या भविष्यात वाढती असल्याने केंद्र सरकारने नगर-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा निर्णय घेतल्यामुळे अनेक ठिकाणी रेल्वेच्या दुहेरीकरणाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे.राहुरी रेल्वे स्थानक येथील मुळा नदीवर प्राचीन काळातील म्हणजे सुमारे 100 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जुना असलेल्या लोखंडी पुलाशेजारी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून नवीन पूल साकारला जात आहे. या पुलाचे काम सध्या वेगाने सुरू आहे.
राहुरी रेल्वे स्थानक येथील मुळा नदीवर असलेल्या जुन्या काळातील पुलाचा मोठा इतिहास आहे. पुलाची उभारणी, पायाभरणी, रेखीव बांधणी ही इंग्रज कालखंडातील आहे. सुमारे 100 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला तरी पूल हा कायम नवीन असल्याचा भास होतो. या पुलाचे काम पूर्ण झाले त्यावेळी कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान विकसित झालेले नव्हते. त्यामुळे जुने तंत्र वापरून हा पूल तयार झाला होता. आता नवीन पूल व जुना पूल यामध्ये काही साधर्म्य असणार आहे. परंतु दोन्ही पुलांचा इतिहास नक्कीच वेगळा आहे.
“राहुरी रेल्वे स्थानक येथील मुळा नदीवर असणारा लोखंडी पूल साधारण 100 वर्ष किंवा त्यापेक्षाही जुना आहे. त्याची उभारणी झाली तो काळ वेगळा होता. व आताचा नवीन पूल होतोय हाही काळ वेगळा आहे. त्यामुळे जुना व नवीन पूल दोन पिढीची ओळख ठरेल,” असे लक्ष्मण धागुडे (ज्येष्ठ नागरिक) म्हणाले.