मुंबई : राज्यात काही दिवसांपासून वातावरण चांगलेच बिघडल्याचे दिसत आहे. त्यातच काल राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले. दरम्यान, या अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका मराठवाड्याला बसला आहे. त्याचबरोबर कोकणासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आजही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. अवकाळी पावसाचा मोठा फटका राज्यातील शेती पिकांना बसला आहे. यामध्ये फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष, आंबा, केळी संत्रा, काजू या बागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. तसेच कलिंगड, गहू, कांदा, हरभरा, या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणातही अवकाली पावसाने हजेरी लावली आहे. तळकोकणात सलग दोन दिवस पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू, कोकम, जाभूळ पिकांना फटका बसला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. या पावसामुळे काही ठिकाणी जावरांचा मृत्यू देखील झाला आहे. तर, गहू, ज्वारी यासह आंब्याचा मोहर पूर्णपणे गळून गेला असून, नव्याने लागवड केलेल्या भाजीपाल्याचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यामुळं अनेक झाडं पडली आहेत. तर शेतामध्ये गारांचा खच पडल्याने संपूर्ण शेताला तलावाच स्वरूप आलं आहे.