संगमनेर, (प्रतिनिधी) – वातावरणात अचानक बदल होऊन संगमनेर तालुक्याच्या काही गावांमध्ये गुरुवारी (दि. 9) वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. दुपारपर्यंत कडक ऊन पडले असताना अचानक अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. शहर आणि परिसरातील तसेच तालुक्याच्या पठार भागातील काही गावांमध्ये पावसाचा शिडकाव झाला. काही ठिकाणी अल्प प्रमाणात तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. लिंबाचे झाड पडल्याने त्याखाली तीन गायी दबून एका गायीचा मृत्यू झाल्याची घटना करूले गावात घडली.
तालुक्यातील समनापूर, वडगाव पान, कोकणगाव, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, करुले, निळवंडे, तळेगाव दिघे, तिगाव, कवठे कमळेश्वर, कासार दुमाला, घुलेवाडी, गुंजाळवाडी, संगमनेर खुर्द, सुकेवाडी, निमज, धांदरफळ, कवठे धांदरफळ, निमगाव पागा आदी गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला.
वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. काही गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस होऊन काही गावांमध्ये पावसाचा शिडकावा झाला. आश्वी खुर्द येथे आठवडे बाजार होता, दुपारपर्यंत वातावरणात उष्णता होती.
तालुक्यातील वडगाव पान येथील उपबाजार समितीमध्ये गुरुवारी कांदा लिलाव होता. या बाजार समितीमध्ये काही प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसाने अनेकांची धावपळ झाली.
सायंकाळी पावसाचे वातावरण झाले होते. संध्याकाळी पाच साडेपाच वाजेच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. जोरदार वादळ देखील सुरू झाले. काढलेला कांदा शेतातच लावून ठेवला होता. वादळी वाऱ्याने कांदावर टाकलेले प्लास्टिक कागद उडून गेल्याने कांदा भिजून नुकसान झाले.
तालुक्यातील करुले येथे परबत देवराम पवार या शेतकऱ्याच्या घराजवळील लिंबाचे झाड वादळानेन पडले. या झाडाखाली पवार यांच्या तीन गाई दबल्या गेल्या. त्यातील एक गाय ठार झाली. तसेच इतरही ठिकाणी झाडे पडली. काहींच्या घराचे पत्रे उडाले. पोल्ट्री व्यावसायिकांचे देखील नुकसान झाल्याची माहिती करुले चे सरपंच बाळासाहेब आहेर यांनी दिली.