लखनऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर असून ते श्रीरामचे दर्शन घेणार आहेत. यासाठी ते अयोध्येत दाखल झाले असून त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र शिंदे यांच्या पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये पोहोचले आहेत. लखनऊमध्ये पोहताच त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
सध्या राज्यातील बळीराजा संकटात असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करत दौरे केले जात आहे. यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. मात्र याला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले की, “पवार काय बोलतात त्यांच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. कारण या देशात बहुसंख्य लोक हिंदू राहतात. त्यामुळे तुम्ही याला हिंदू राष्ट्र म्हणा नाही तर म्हणू नका हे हिंदू राष्ट्रचं आहे. भारतामध्ये बहुसंख्य हिंदू राहतात.”
पुढे त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आज पाहायला मिळते आहे. वारसा हा जन्माने नाही तर विचारांनी मिळते हेच एकनाथ शिंदेंनी दाखवून दिल्याचे म्हंटले. तसेच फडणवीसांनी रामलल्लाचं दर्शन घेण्याची इच्छा पुर्ण होत असल्याचा आनंद देखील व्यक्त केला.
काय म्हणाले होते शरद पवार ?
“हा कार्यक्रम त्यांनी घेतला आहे. त्यांनी सांगितलं की, आमच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. त्यांची श्रद्धा तिथं आहे. पण आमची श्रद्धा शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्याचं पाणी कसं पुसता येईल, कशी मदत करता येईल, त्यात आमची श्रद्धा आहे,” अशी टीका शरद पवारांनी केली होती.