रॉयल चॅलेंजर बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. या स्पर्धेच्या इतिहासात तब्बल 11 व्या वेळा मुंबईने स्पर्धेतील सलामीचा सामना गमावला आहे. कर्णधार रोहित शर्मा पराभवानंतर जे बोलला ते ऐकून आश्चर्य वाटले नाही कारण गेल्या काही महिन्यांपासून तो हेच बोलत आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून रोहित पूर्ण बदलला आहे, त्याची देहबोलीच सर्वकाही सांगून जाते. पूर्णपणे नकारात्मकता त्याच्या देहबोलीतून दिसत आहे. हे असे खेळण्यापेक्षा व नेतृत्व करण्यापेक्षा सन्मानाने कर्णधारपद सोडलेले बरे नाही का किमान आयपीएल स्पर्धेत तरी.
बंगळुरुविरुद्धच्या रविवारी झालेल्या लढतीत तो तब्बल 10 चेंडू खेळून अवघी एक धाव काढून बाद झाला. हा कोणीतरी अनोळखी रोहित आहे. पूर्वीचा तो हिटमॅन आता त्याच्यापासून कुठेतरी हरवला आहे. रोहितसह सगळ्याच प्रमुख फलंदाजांनी टाकलेल्या नांगीनंतर तिलक वर्माने लज्जारक्षण केले. मात्र, संपूर्ण आभाळच जिथे फाटलय तिथे ढिगळं जोडून काही होणार नाही हेच या सामन्यातून दिसले.
प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या स्पर्धेत खेळत नसल्याने मुंबईला फटका बसला असे बोलले जात आहे. मात्र, त्यात तथ्य नाही. बुमराहने असे कीती सामना मुंबईला जिंकून दिले आहेत की तो नाही तर संघाचा पराभवच होणार. मुळातच मुंबईने बुमराहशिवाय खेळण्याची सवय करायला हवी होती; पण तीच केली नाही.
रोहित म्हणतो, आम्हाला 30-40 धावा कमी पडल्या. ज्या पद्धतीने विराट कोहली व फाफ डुप्लेसी खेळत होते ते पाहता मुंबईने आणखी 70-80 धावा जरी जास्त केल्या असत्या तरीही निकालात कोणताही फरक पडला नसता.
मुळातच रोहितच्या नेतृत्वातील चमक केव्हाच निघून गेली आहे. त्याच्याकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवले गेल्यापासून त्याची देहबोलीच बदलली आहे. कदाचित त्याला कर्णधारपदाचा काटेरी मुकुट नकोसा आहे पण जबरदस्तीने तो डोक्यावर ठेवावा लागल्याचे आता स्पष्ट दिसत आहे. त्याची हीच नकारात्मकता त्याच्यासह संपूर्ण संघाला या स्पर्धेत भोवणार आहे. यावर वेळीच उपाय केला नाही तर हा आजार आपल्याला आगामी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेतही अत्यंत महाग पडू शकतो.