पिनकोडचे जनक, नाटककार, कवी, लेखक श्रीराम भिकाजी वेलणकर यांचा आज स्मृतिदिन (निधन 1 एप्रिल 1999). त्यांचा जन्म त्यांच्या आजोळी संगमेश्वर तालुक्यातील माखजन जवळील सरंद गावी 22 जून 1915 रोजी झाला. त्यांचे वडील शिक्षक असल्याने त्यांची बदली होत असे. वयाच्या आठव्या वर्षीच ते मातृसुखाला पारखे झाले. त्यांचे शिक्षण राजापूर हायस्कूलमधून झाले. विद्यार्थी दशेतच त्यांनी शाळेच्या त्रैमासिकात पहिली संस्कृत कविता लिहिली.
त्यांनी प्रशासकीय नोकरी करीत असताना 100 हून अधिक ग्रंथ लिहिले. त्यांनी मराठी, संस्कृत, इंग्रजी, हिंदी, जर्मन, पाली, अर्धमागधी या भाषांवर प्रभुत्व मिळविले होते. त्यांनी मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात कला शाखेला प्रवेश घेतला आणि गोकुळदास तेजपाल वसतिगृहात दाखल झाले. त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या मिळवून पदव्युत्तर परीक्षेत प्रथम क्रमांक कायम ठेवला. त्यांनी लेखनाबरोबर संगीतशास्त्राचा अभ्यास व त्यावर लेखनही केले. त्यांनी “गीतगीर्वाण’ नावाचा संगीतग्रंथ लिहिला. या ग्रंथाचा भारतीय संगीतातील “मूळ संदर्भ ग्रंथात’ समावेश केला आहे. त्यांनी जर्मन भाषा शिकून “सिमिलीज इन वेदाज’ या जर्मन ग्रंथाचा इंग्रजीत अनुवादित केला. बांद्य्राचे प्रसिद्ध वकील जोशी यांच्याकडे ते वकिली अभ्यासाच्या निमित्ताने जात असत. तेथे त्यांची कन्या सुधाची ओळख झाली व ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन त्याची परिणीती विवाहात झाली.
वर्ष 1940मध्ये ते भारतीय टपाल तार खात्यात प्रथमश्रेणी अधिकारी बनले. वेलणकर कोलकाता येथे पोस्ट आणि तार विभागाचे संचालक असताना, एक लष्करी जवान त्यांना भेटायला आला. त्याचे वडील केरळमध्ये रहात होते. त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यांच्या आजारी वडिलांच्या प्रकृतीची माहिती देणारी पत्रे त्या जवानाला मिळत नव्हती. पत्र मिळण्यास एक ते दीड महिना जातो, अशी तक्रार त्याने वेलणकरांकडे केली. हे ऐकून वेलणकरही व्यथित झाले. त्यावर उपाय काढणे अवघड होते. यासाठी बराच प्रयत्न केल्यावर गणिताच्या सहाय्याने संपूर्ण देशाचे संख्यांच्या आधारे 9 भाग केले. यातले 8 भाग हे भौगोलिक विभाग आहेत, तर एक मिलिट्रीसाठी वापरला जातो. यानंतर त्यांनी प्रत्येक विभागांत येणाऱ्या जिल्ह्यांचे क्रमांक दिले व तेथे येणाऱ्या मेलला क्रमांक दिले.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वेलणकरांना बोलवून घेतले व त्यांच्याकडूनच या व्यवस्थेची माहिती करून घेतली होती. ही पिनकोड प्रणाली 15 ऑगस्ट 1972 रोजी संपूर्ण देशात लागू करण्यात आली. या मोहिमेचा परिणाम असा झाला की, दुर्गम भागातही लोकांना आठवडाभरात पत्रे मिळू लागली. निवृत्तीनंतर टपाल खात्याच्या विनंतीवरून त्यांनी “टपाल व्यवस्था’ हे पुस्तकही लिहिले. “शिवछत्रपतिः’ नाटकासाठी उपराष्ट्रपतींद्वारा त्यांना गौरवण्यात आले होते तसेच संस्कृत सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपतीपदक देऊन त्यांचा सन्मान केला गेला.