सातारा – खासदार उदयनराजे भोसले यांनी अजिंक्य उद्योग समूहाबद्दलचे तुणतुणे वाजवणे त्यांनी बंद करावे. अजिंक्यतारा उद्योग समूहाची वार्षिक उलाढाल साडेतीनशे कोटी रुपयांची आहे. या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार मिळाला असून अनेकांचे संसार उभे राहिले आहेत. अशी एखादी संस्था उदयनराजे यांनी उभी केली आहे काय, खासदारांचे टोलनाक्याचे अर्थकारण संपूर्ण जिल्ह्याला ठाऊक आहे. असे टोल नाके चालवणाऱ्या खासदारांनी आम्हाला शिकवू नये, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना लगावला.
येथील सुरुची निवासस्थानात पत्रकारांशी संवाद साधताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, “”गेल्या पाच सहा वर्षाच्या वाटचालीत उदयनराजे सातत्याने अजिंक्य उद्योग समूहावर टीका करत आहेत. मात्र, अजिंक्य उद्योग समूह साडेतीनशे कोटीचा नेटवर्थ असलेला कारखाना आहे. शेतकऱ्यांची बिले पंधरा दिवसाच्या आत जमा केली जातात. सूतगिरणीमध्ये 200 कामगार कामाला असून तीन कोटी रुपये पगाराला आणि बोनसला वीस लाख रुपये दिले जातात. सातारा तालुक्याच्या अर्थकारणामध्ये अजिंक्य उद्योग समूहाचा मोठा हातभार आहे. आपण काहीच केलेले नाही.
त्यामुळे आपण अजिंक्य उद्योग समूहाच्या भ्रष्टाचाराचे तुणतुणे वाजवणे बंद करावे. सातारा शहरासाठी डीपीडीसी आणि राज्य शासनाच्या माध्यमातून हद्दवाढीच्या दृष्टीने मंजूर कामांचा पाठपुरावा आणि त्याला निधीची उपलब्धता ही मी सातत्याने केली आहे.” उदयनराजे यांच्या एकाही विकासकामाचे श्रेय घेण्याचा मी कधीही प्रयत्न केलेला नाही आणि मला त्याची गरजही नाही. मात्र, सातारा विकास आघाडीने पालिका धुऊन खाल्ली. काही लोकांना “मिशा काढीन, भुवया काढीन,’ असे डायलॉग मारण्यापलीकडे काही काम नाही. समोरासमोर एकदा या आणि होऊन जाऊ द्या, असं ते नेहमीच म्हणतात. पण समोरासमोर येऊन करायचे काय, तुमचा पाच वर्षाचा भ्रष्टाचार, नाकर्तेपणा लपवण्यासाठी भावनिक राजकारण करत आहात. सातारा पालिका भ्रष्टमुक्त करण्यासाठी आम्ही तयारीला लागलो आहोत, उदयनराजे आणि त्यांच्या आघाडीला सातारकर लवकरच नारळ देणार यात शंका नाही, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले.