मराठी चित्रपटसृष्टीवर एके काळी ज्यांनी राज्य केले असे दादा कोंडके यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा विशेष लेख…
दादा कोंडके म्हटले की, सर्वसाधारण चेहरा, हाफ पॅंट व त्या पॅंटीला लोंबकळणारी मोठी नाडी, असा त्यांचा पेहराव आपल्या डोळ्यासमोर येतो. पण या सगळ्यात दादा कोंडके म्हटले की लक्षात येण्याजोगी बाब म्हणजे त्यांचे “द्विअर्थी संवाद’ होय. दादांनी त्यांच्या चित्रपटांसाठी लिहिलेली गीते ही मराठी रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजविताना दिसतात. अगदी साध्या गावरान बाजेत लिहिलेली ही गीते रसिकांच्या ओठावर अगदी सहजतेने स्फुरताना दिसतात इतका त्यात साधेपणा व सहजपणा. दादांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 रोजी कृष्णाष्टमीला झाल्यामुळेच त्यांच्या आई-वडिलांनी “कृष्णा’ हे नाव ठेवले होते. पण सतत आजारी पडत असल्याकारणाने त्यांच्या आईने (सखुबाई) “कृष्णा’ या नावाने हाक न मारता “दादासाहेब’ या नावाने हाक मारायला सुरुवात केली. कारण त्यांना कोणीतरी सांगितलेले असते की नावाने हाक मारू नका म्हणजे त्याला फरक पडेल. यातूनच “दादा’ हे बिरुद त्यांना चिकटलेले दिसते. त्यांचे संपूर्ण नाव कृष्णा (दादासाहेब) खंडेराव कोंडके.
दादांच्या जीवनामध्ये अनेक वादळे आली. मग ती कौटुंबिक असो की व्यावसायिक असो पण दादा खचले नाहीत. सतत कार्यतत्पर, कृतीशील, मनमोकळा स्वभाव, कष्ट करण्याची वृत्ती, हजरजबाबीपणा अशा या अंगच्या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांनी चित्रपटसृष्टीत कसलाही वारसा नसताना, आपला एक वेगळाच दबदबा निर्माण केला. यशाची चव त्यांनी त्यांच्या या कर्तृत्वातून अगदी अल्पावधीत चाखलेली दिसते. कायम यशाचे बिरुद घेऊन मिरवणाऱ्या दादांना तितकाच संघर्षही करावा लागलेला दिसतो.
बालपण : बालपण म्हटले की मौजमस्ती करायचे वय असते. बालपण सर्वांनाच हवेहवेसे वाटते. दादा कोंडके यांचे बालपणही असेच मौज मस्तीत, खोड्या करण्यात गेले. त्यांचा स्वभावही फार बोलका होता. त्यांच्या या सर्वस्वी वागण्यातच त्यांच्या पुढील आयुष्याच्या कारकिर्दीची मुळे रुजलेली दिसतात. पुढे विनोदवीर म्हणून नावारूपाला आलेल्या दादांचा हा पिंड बालपणापासूनच बनल्याचा दिसतो.
चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकण्यापूर्वी दादा सात-आठ वर्षांचे असल्यापासूनच विविध चित्रपटांतील लोकप्रिय गाण्यांवर स्वतःची गाणीही रचायचे. सुरुवातीला ते राहात असलेल्या भोई वाड्यातल्या श्रीकृष्ण बॅंड पथकामध्ये होते. त्यांना सिनेमा पाहण्याची विलक्षण आवड होती. पुढे त्यांनी “सेवा दला’च्या “कुणाला कुणाचा मेळ नाही’ या लोकनाट्यामध्ये पहिल्यांदा शिपायाची एक छोटी भूमिका केली. त्यानंतर त्यांनी “विच्छा माझी पुरी करा’ हे लोकनाट्य तयार केले व ते अल्पावधीतच नावारूपाला येऊन अत्यंत लोकप्रियही ठरले. याविषयी दादा सांगतात की, “विच्छा’ने नाव, पैसा, इज्जत सर्व काही दिलं.’ यानंतर त्यांनी चित्रपटांतूनही भूमिका स्वीकारल्या. दादांचे गुरू भालजी पेंढारकर यांनी त्यांच्या “तांबडी माती’ या चित्रपटामध्ये दादांना भूमिका करण्याची संधी दिली; पण हा चित्रपट अयशस्वी ठरला. “दादांनी लोकनाट्यातच काम करावं, सिनेमाधंद्यात त्यांचा चेहरा योग्य नाही’ असेही म्हटले जाऊ लागले. तर काहींनी “लोकनाट्यातला माणूस’ म्हणूनही दादांना हिणवले. हा काळ दादांसाठी खऱ्या अर्थाने अत्यंत कसोटीचाच म्हणता येईल. पण दादा थांबले नाहीत की बावरले नाहीत. त्यांनी आलेल्या या अपयशालाच आपली ऊर्जा म्हणून वापरले व चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये यशस्वी पाऊल टाकले.
चित्रपट निर्मिती क्षेत्रात यशस्वी पाऊल : दादांनी त्यांचा पहिला “सोंगाड्या’ हा चित्रपट निर्माण केला. कसलाही मुहूर्त न पाहता अमावास्येलाच त्यांनी आपला हा पहिलावहिला चित्रपट प्रदर्शित केला. पुण्या-मुंबईसारख्या शहरांतून या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळविली. दादांचे चित्रपटनिर्मिती क्षेत्रातील हे यशस्वी पाऊल म्हणावे लागेल. दादांच्या अनेक चित्रपटांची स्टोरी ही त्यांच्या मनामध्ये अगोदरच ठरलेली असायची. एक चित्रपट निर्माण होत असतानाच त्यांच्या मनामध्ये दुसऱ्या चित्रपटाची कथा तयार असायची. “एकटा जीव सदाशिव’, “आंधळा मारतो डोळा’, “पांडू हवालदार’, “तुमचं आमचं जमलं’, “राम राम गंगाराम’, “बोट लावीन तिथं गुदगुल्या’, “ह्योच नवरा पाहिजे’, “आली अंगावर’, “मुका घ्या मुका’, “मला घेऊन चला’, “पळवापळवी’, “येऊ का घरात?’, “सासरचं धोतर’, “वाजवू का?’ या मराठी चित्रपटांची निर्मिती दादांनी केली तर “तांबडी माती’ व “गनिमीकावा’ या भालजी पेंढारकरांच्या चित्रपटांतून त्यांनी कामही केले. “तेरे मेरे बीच में’, “आगे की सोच’ या हिंदी चित्रपटांचीही त्यांनी निर्मिती केली. तर गजानन शिर्के यांनी “पांडू हवालदार’ वर आधारित निर्माण केलेला गुजराथी चित्रपट “चंदू जमादार’ व “राम राम गंगाराम’च्या धर्तीवर निर्माण केलेला “रामराम आत्माराम’ या चित्रपटांतूनही दादांनी काम केले.
दादांचे प्राणी प्रेम : दादांनी चित्रपटांसाठी आवश्यक तेथे प्राण्यांचा वापरही केल्याचे दिसते. पण त्या प्राण्यांना त्यांनी वाऱ्यावर न सोडता त्यांना मरेपर्यंत सांभाळले. त्यांना ते कधीही विसरले नाहीत. याविषयी ते म्हणतात की, “ज्या ज्या चित्रपटांत मी बकरी, कुत्रा, गाढव वगैरे प्राणी वापरले, ते सर्व मी विकत आणले आणि त्यांना मरेपर्यंत सांभाळलं. आपल्या स्वार्थासाठी आपण प्राण्यांचा वापर करायचा व नंतर त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं, हे मला पटत नाही.’
दादांचे शब्दप्रयोग : दादा कोंडके यांच्या चित्रपटांचे शीर्षक असो की चित्रपटातील गीते किंवा द्विअर्थी संवाद असोत हे सर्व सेन्सॉरच्या कचाट्यात मात्र सापडत होते. दादांनीही या सेन्सॉरशी दोन हात केलेले दिसतात. दादा कोंडके यांच्या “सोंगाड्या’, “तुमचं आमचं जमलं’ या चित्रपटातील गीते, “बोट लावीन तिथं गुदगुल्या’, “राम राम गंगाराम’ मधील संवादांवर सेन्सॉरने आक्षेप घेतले. पण दादा बधले नाहीत. काही ठिकाणी आवश्यक तेथे नाईलाजाने का होईना त्यांनी बदल केला. पण असे असले तरी दादांचे या चित्रपटातील डबलमिनिंग मागचे गणितही खूप अभ्यासपूर्ण होते. ते सेन्सॉर बोर्डातील सदस्यांना आपल्या परिपूर्णतेने या द्विअर्थी शब्दांविषयीचे विश्लेषण देतात. त्यांचा सरळ अर्थही ते सांगतात. त्यांचे या शब्दांवर प्रभुत्वही होते. त्यासाठी त्यांनी शब्दकोशाचाही वापर केलेला दिसतो. एकूणच माहिती घेऊनच अभ्यासाअंती दादांनी असे शब्दप्रयोग केलेले दिसतात. दादांनी निर्माता-दिग्दर्शक-गीतकार-कथा-पटकथा-संवाद-कलाकार भूमिकांतून यश मिळवले. अशा या चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व्यक्तिमत्त्वास स्मृतिदिनानिमित्त (14 मार्च 1998) अभिवादन.