नवी दिल्ली: काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ ला संपूर्ण देशात भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता पक्ष ऍक्शनमोड आल्याचे दिसून येत आहे. कारण भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीरपर्यंत पार पाडल्यानंतर आता काँग्रेस देशाच्या पूर्व भागातून पश्चिम भागात यात्रा काढण्याच्या विचारात आहे. अरुणाचल प्रदेशातील पासीघाट ते गुजरातमधील पोरबंदरपर्यंत ही यात्रा काढली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी याविषयी माहिती दिली. एव्हडेच नाही तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या अधिवेशनात भाषण करताना या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याविषयी संकेत दिले होते. त्यानंतर आता रमेश म्हणाले, ‘यात्रा अरुणाचलच्या पासीघाट येथून सुरू होऊन गुजरातच्या पोरबंदर येथे संपण्याचा पक्षाचा विचार असून त्याबद्दल आम्ही खूप उत्साही आहोत, व्यक्तिशः प्रत्येक कार्यकर्त्याला याची गरज आहे, असे आपल्याला वाटते.’असेदेखील रमेश यांनी यावेळी म्हटले.
पुढे बोलताना रमेश यांनी,’पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या यात्रेचे स्वरूप दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या यात्रेपेक्षा वेगळे असेल. ती इतक्या विस्तृत प्रमाणात नसेल.’ येत्या काही आठवड्यांत याबाबत सर्व नियोजन केले जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
तसेच ईशान्येकडील भौगोलिक आणि हवामानाचा विचार करता यात्रेसाठी वाहतुकीच्या विविध पद्धती (मल्टी-मॉडल) वापरल्या जाऊ शकतात. परंतु मुळात ही पदयात्रा असेल. ‘भारत जोडो यात्रे’च्या तुलनेत या यात्रेत सहभागी होणाऱ्यांची संख्या कमी असू शकते, असेही रमेश म्हणाले.