मुंबई : केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराला केंद्र सरकारकडून मंजुरी दिली. त्यामुळे लवकरच औरंगाबादचे नाव आता छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव होणार आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा मुद्दा अजून ताजा असताना आता राज्यातील आणखी एका शहराचे नाव बदलण्याची मागणी समोर येत आहे. अहमदनगरचे नाव बदलण्याची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिवनंतर आता अहमदनगरच्या नामकरण करण्यासाठी भाजप गोटात सुरू हालचाली सुरू झाल्या आहेत. अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली होणार, असं ट्विट भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन.त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ मा.@Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वात होणारच.@BJP4Maharashtra @mieknathshinde
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) February 25, 2023
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन. त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणारच, असे ट्विट पडळकर यांनी केले आहे.
दरम्यान, पडळकर यांनी यापूर्वीदेखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ करा, अशी मागणी केली होती. त्यांनी पत्र लिहून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. पडळकर यांनी तेव्हा पत्रात लिहून मागणी केली होती की, ‘जेव्हा हिंदूस्थान मुसलमानी राजवटीत हिंदूसंस्कृती, मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी या हिंदुसंस्कृतीत प्राण फुकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. म्हणून तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे की हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात यावे’.