मुंबई – सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ‘बॅनर्स’ हा चर्चेचा विषय ठरत असून, राष्ट्रवादीच्या अनेक राजकीय नेत्यांचे सध्या ‘भावी मुख्यमंत्री’ असे लिहिण्यात आलेले बॅनर्स लावण्यात येत आहेत. काहीदिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या त्यांच्या घराच्या परिसरामध्ये “माझं दैवत भावी मुख्यमंत्री’ अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले होते.
त्यानंतर, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे देखील या पद्धतीचे बॅनर्स लावण्यात आले होते. ‘पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री’ म्हणून सुप्रिया सुळे यांची अज्ञात्तांकडून बॅनरबाजी करण्यात आली होती. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून राष्ट्रवादीत मतभेद आहेत का? असा प्रश्न सामान्य जनतेला आणि राजकीय नेत्यांना पडू लागला आहे.
दरम्यान, आता या सगळ्या प्रकरणावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पवार माध्यमांशी बोलत होते. भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तीन नेत्यांची बँनरबाजी केली गेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या तिन्ही नेत्यांमध्ये प्रतीस्पर्धा सुरु आहे का?
असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता शरद पवार म्हणाले, “बॅनरबाजी म्हणजे बालिशपणाचे लक्षण असून, हे कुणीतरी चुकीचे काम केलं आहे… हा पोरकट पणा आहे.. एकाच पक्षात असं काम कोण करेल का…?’ असं शरद पवार यावेळी म्हणाले. या संदर्भातील त्यांचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.