वॉशिंग्टन – जगाच्या लोकसंख्येने जरी 800 कोटीचा टप्पा पार केला असला तरी अनेक देशांमध्ये जननदर घटला असल्याने त्या देशांनी आता लोकसंख्या वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी विविध योजनांचीही घोषणा करण्यात आली आहे. जागतिक पातळीचा विचार करता प्रति सेकंदाला तीन ते चार मुलांचा जन्म होतो.
म्हणजे 2037 पर्यंत जगाची लोकसंख्या 900 कोटीपेक्षा जास्त असेल. पण जगातील अनेक देशांमध्ये जनन दर घटला असल्याने त्याची गंभीर दखल या देशांनी घेतली असून लोकसंख्या वाढविण्यासाठी काही योजना तयार करण्यात आल्या आहेत. त्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनसह जपान ऑस्ट्रेलिया रशिया जर्मनी या देशांचा समावेश आहे.
या देशांनी जननदर घटला असल्याने लोकसंख्या वृद्धीसाठी काही योजना तयार केल्या आहेत. चीनने तर लग्नानंतर हनिमूनला जाण्यासाठी जोडप्यांना एका महिन्याची संपूर्णपणे पगारी रजा मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनसह या सर्व देशांमध्ये सध्याची जी लोकसंख्या आहे त्याचा वयोगट 40 पेक्षा जास्त आहे. म्हणजेच या देशांमध्ये तरुण लोकसंख्येचे प्रमाण कमी आहे. दुसरीकडे भारतामध्ये मात्र हे प्रमाण जास्त आहे.
आगामी कालावधीमध्ये मनुष्यबळाची कमतरता जाणवण्याच्या चिंतेतून या देशांनी लोकसंख्यावाढीचे प्रयत्न सुरू केले आहेत. जपानने जन्मलेल्या प्रत्येक मुलाला सहा लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. जपानमध्ये गेल्या काही कालावधीमध्ये विवाहाचे प्रमाणही कमी झाले असून विवाहानंतर मुलाला जन्म देण्यामध्ये सुद्धा अनेक जोडपी विलंब लावत असल्याचे लक्षात आल्यानेच अशा प्रकारची योजनांची घोषणा करण्यात आली आहे.
रशियाने दुसरा किंवा तिसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर सात लाख रुपये बक्षीसाची घोषणा केली आहे. इटलीमध्ये मुलांचा संपूर्ण खर्च सरकारतर्फेच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रोमानिया देशामध्ये मुलांना जन्म न देणाऱ्या जोडप्यांना जादा कर आकारला जात आहे. जी जोडपी मुलांना जन्म देणार नाही त्यांना 20 टक्के जास्त कर द्यावा लागणार आहे. तुर्कीमध्येही प्रत्येक मुलाच्या जन्मानंतर बक्षीसाची घोषणा करण्यात येते. पहिल्या मुलाच्या जन्मानंतर 270 डॉलर, दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर 300 डॉलर आणि तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर 360 डॉलर बक्षीस दिले जाते. हॉंगकॉंगमध्ये सुद्धा मुलाला जन्म दिल्यानंतर जोडप्यांना बक्षीस दिले जात आहे.